
Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यात आठही जिल्ह्यांतील पूरप्रवण गावांची संख्या १०१३ असून, १४६३ गावे नदी काठावर वसलेली असल्याचे प्रशासनाच्या अहवालात पुढे आले आहे. नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक पूरप्रवण गावे असून, त्या पाठोपाठ छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, परभणी, लातूर, हिंगोली, बीड, जालना आदी जिल्ह्यांतील पूरप्रवण गावांचा क्रमाने समावेश आहे.
पावसाळा तोंडावर आला असताना मराठवाड्यातील प्रमुख नद्या आणि पूरप्रवण गावांची संख्या, कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून शासन प्रशासन स्तरावरून त्यासाठीचे नियोजनाचा मुद्दा ऐरणीवर आहे.
मराठवाड्यात गोदावरी, पूर्णा, दुधना, पैनगंगा, मांजरा, तेरणा या प्रमुख नद्या असून इतरही उपनद्या आहेत. मॉन्सूनपूर्व तयारी व संभाव्य धोक्यांचा आढावा घेण्याची काम प्रशासन व शासन स्तरावरून याआधी झाले व सुरू आहे.
गत नऊ वर्षांतील पर्जन्यमानाचा आढावा घेता सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत २०१४, २०१५, २०१७, २०१८, २०१९ मध्ये पाऊस कमी झाला. तर २०१६, २०२०, २०२१ व २०२२ या वर्षांमध्ये सरासरीच्या पुढे जाऊन पाऊस झाला आहे. पुराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासकीय स्तरावरून आवश्यक ती तयारी सुरू आहे.
... सात रस्त्यांवरील प्रमुख पूल होतात पुराने बाधित
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर-अहमदनगर मार्गावरील कायगाव येथील, तसेच पैठण - शेवगाव मार्गावरील पैठण येथील, गेवराई- बीड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ वरील शहागड येथील, परतुर-जालना मार्गावरील लोणी येथील, माजलगाव- पाथरी राज्य महामार्ग क्रमांक २९९ वरील ढालगाव येथील, परभणी-गंगाखेड मार्गावरील गंगाखेड येथील, तसेच नांदेड- लातूर मार्गावरील नांदेड येथील पूल पुराने बाधित होणाऱ्या पुलांच्या यादीत आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये पूर प्रवण साहित्य उपलब्ध
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पूर प्रवण गावांची संख्या १६५ आहे. जिल्ह्यात १० बोटी, ३०७ लाईफ जॅकेट व १६२ लाईफ बॉय बचाव साहित्य उपलब्ध आहे. याशिवाय हनुमंतगाव ता. वैजापूर, नवगाव ता. पैठण, गोलटगाव ता. छत्रपती संभाजीनगर, मुर्डेश्वर ता. सिल्लोड येथे वीज अटकाव यंत्रणा उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.
...असा आहे सात वर्षांत पुराचा इतिहास
- २००५ मध्ये गोदावरी व दुधना या नद्यांना पूर आला त्यामध्ये जालन्यातील ४२ नांदेडमधील ६६ मिळून १०८ गावे बाधित झाली
- २००६ मध्ये पाच जिल्ह्यातील नद्यांना पूर येऊन छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड या तीन जिल्ह्यांतील ११३ गावे बाधित झाली
- २००८ मध्ये जायकवाडी धरणातील पाणी सोडल्यामुळे गोदावरीला पूर येऊन छत्रपती - संभाजीनगर व जालना जिल्ह्यातील ३३ गावे बाधित झाली
- २०१३ जून, जुलैमध्ये जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातील गावे बाधित झाली.
- २०१६ मध्ये सप्टेंबरमध्ये बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील गावे बाधित झाली
- २०२१ मध्ये ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान लातूर जिल्ह्यातील सात, धाराशिवमधील तीन व छत्रपती संभाजीनगरमधील १५ गावे बाधित झाली.
- २०२२ मध्ये जुलै महिन्यात हिंगोली जिल्ह्यातील कुरुंदा गाव बाधित झाले.
जिल्हानिहाय पूरप्रवण
गावांची संख्या
छत्रपती संभाजीनगर - १६५
जालना- ४७
परभणी - ११८
हिंगोली- ७०
नांदेड - ३३७
बीड - ६३
लातूर - ७३
उस्मानाबाद- १४०
जिल्हानिहाय नदीकाठावरील
गावांची संख्या
छत्रपती संभाजीनगर - ४३
जालना १७७
परभणी - २८६
हिंगोली- ७०
नांदेड - ३३७
बीड - ३०६
लातूर - १५८
उस्मानाबाद - ८६
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.