Pune News : ‘‘जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणाच्या दर्जावृद्धीसाठी ‘एक ग्रामपंचायत एक शाळा’ हा उपक्रम राबविण्यात येईल. यासाठी शाळांचे क्लस्टर करण्यात येत आहे. कमी शिक्षकांमध्ये जास्तीत जास्त मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येईल,’’ अशी माहिती पुणे जिल्हा परिषदेचे प्रशासक आयुष प्रसाद यांनी दिली. ‘‘जिल्ह्यात सध्या ३ हजार ६३८ शाळा आहेत, तर १ हजार ३७५ ग्रामपंचायती आहेत. ‘जिथे शक्य आहे तिथे एकच शाळा करण्यात येईल,’’ असेही ते म्हणाले.
कोरोना नंतरच्या शालेय शिक्षणाच्या दर्जाबाबत त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणाची माहिती या वेळी प्रसाद यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘कोरोनाच्या संसर्गामुळे शिक्षणात खंड पडल्याचा परिणाम जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणावरही झाला होता. कोरोना काळातील अपूर्ण राहिलेली अध्ययन क्षमता पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेकडून प्रयत्न केले जात आहेत.
गेल्या दोन वर्षांत जिल्हा परिषदेच्या पहिली आणि पाचवी इयत्तेत विद्यार्थ्यांनी अपेक्षित क्षमता प्राप्त केली आहे. मात्र इयत्ता तिसरीतील विद्यार्थी आकलन आणि प्रमाणित वाचनात पाठीमागे असल्याची माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे.’’
‘‘लाइफ लीडरशिप फॉर इक्विटी या संस्थेने २०२१-२२ आणि २०२२-२३ या दोन वर्षांत जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील निवडक शाळांत हे सर्वेक्षण केले. इयत्ता पहिलीतील गणित विषयात ९६ टक्के विद्यार्थी त्यांच्या इयत्तेतील अपेक्षित क्षमता प्राप्त केली आहे.
लिपी परिचय क्षमतेत ९० टक्के विद्यार्थ्यांनी अपेक्षित कामगिरी केली. मुलाची बोली अर्थात माहिती मिळविण्यासाठी प्रश्न तयार करणे, या क्षमतेत ४३ टक्के विद्यार्थी मागे आहेत. त्याचप्रमाणे संख्या ओळखणे आणि लिहिणे, यात ३६ टक्के विद्यार्थी मागे आहेत,’’ असे प्रसाद यांनी सांगितले.
इयत्ता तिसरीत ७७ विद्यार्थी अचूकपणे विरामचिन्हे ओळखत आहेत. वाचून आकलन करण्यात ३६ टक्के विद्यार्थी पाठीमागे आहेत. प्रमाणित मापन या क्षमतेत ७७ टक्के विद्यार्थी पाठीमागे आहेत. इयत्ता पाचवीमधील ९० टक्के मुले वाचून आकलन आणि गुणाकार या क्षमतेत अपेक्षित कामगिरी करीत आहेत. मात्र शब्द संपत्तीत ४६ टक्के आणि अपूर्णांक या क्षमतेत ७० टक्के विद्यार्थी पाठीमागे असल्याचे दिसून येत आहे.
‘प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ’
‘‘कोरोना काळात शिक्षणाचा खंड पडलेल्या पुरंदर, शिरूर, मुळशी, हवेली, मावळ आणि खेड या ६ तालुक्यांमधील २७ शाळांमधील १ हजार ४४७ विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. यातून आलेल्या निष्कर्षानंतर ‘निपुण भारत अभियान’अंतर्गत पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यावर लक्ष केंद्रित केले. त्यानुसार सेतू अभ्यासक्रम, निपुण गुणवत्ता वृद्धी कार्यक्रम आदी उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केल्याने प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता वाढली आहे,’’ असे प्रसाद म्हणाले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.