महाराष्ट्रावर १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे किमान तापमानात सरासरीपेक्षा ३.१ ते ५ अंश सेल्सिअसने घट होईल. विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात तापमान सरासरी कमी असेल. तसेच मध्य महाराष्ट्रात कमाल तापमानात १.६ ते ३ अंश सेल्सिअसने घट होईल. मात्र, कोकणात कमाल तापमान सरासरी पेक्षा १.६ ते ३ अंश सेल्सिअसने अधिक राहील. कोकण, मराठवाडा, मध्य विदर्भ, पूर्व विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रात हवामान अंशतः ढगाळ राहील. वाऱ्याचा ताशी वेग साधारणच राहील. वाऱ्याचा दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून राहील. सकाळच्या आर्द्रतेचे प्रमाण चांगले राहील. मात्र, दुपारी हवामान कोरडे राहील. प्रखर सूर्यप्रकाश, रात्री व सकाळी थंडी ही हवामान स्थिती ऊस पिकात साखरेचे प्रमाण वाढण्यास अनुकूल राहील. यापुढील काळात दिवसाचा कालावधी कमी होत जाऊन रात्रीचा कालावधी वाढत जाईल. गुरुवार (ता. १०) नंतर हवेच्या दाबात वाढ होत जाऊन थंडीचे प्रमाण वाढण्यास हवामान अनुकूल बनेल. त्याचा फायदा रब्बी हंगामातील गहू, हरभरा पिकांना होईल. या आठवड्यात पावसाची शक्यता नाही.
कोकण ः
या आठवड्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान ठाणे व पालघर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत आकाश जास्त प्रमाणात ढगाळ तर रायगड व ठाणे जिल्ह्यांत अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत ६८ ते ७६ टक्के, तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ५२ ते ५७ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ४२ ते ४९ टक्के आणि रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३० ते ३२ टक्के इतकी कमी राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते ९ कि.मी. आणि दिशा ईशान्येकडून राहील.
उत्तर महाराष्ट्र ः
कमाल तापमान नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस, तर धुळे व जळगाव जिल्ह्यांत ३३ ते ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान धुळे व जळगाव जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस, तर नाशिक व नंदूरबार जिल्ह्यात २० ते २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४१ ते ५२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २० ते २५ टक्के इतकी कमी राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ७ कि.मी. व दिशा आग्नेयेकडून राहील.
मराठवाडा ः
कमाल तापमान उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस, तर नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. औरंगाबाद जिल्ह्यात कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यांत १७ अंश सेल्सिअस, तर नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस आणि औरंगाबाद जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, लातूर, नांदेड, बीड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ६६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २६ ते ३६ टक्के राहील. हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते १० कि.मी. आणि दिशा आग्नेयेकडून राहील.
पश्चिम विदर्भ ः
बुलडाणा व अमरावती जिल्ह्यांत कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, तर अकोला व वाशीम जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सर्व जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ५० ते ५२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २५ ते २७ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ४ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील.
मध्य विदर्भ ः
कमाल तापमान यवतमाळ जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस, राहील. किमान तापमान वर्धा जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५५ ते ५८ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २९ ते ३३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ५ कि.मी. आणि दिशा ईशान्येकडून राहील.
पूर्व विदर्भ ः
सर्वच जिल्ह्यात कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १९ अंश सेल्सिअस राहील. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५८ ते ६७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३५ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ ते ३ कि.मी. आणि दिशा ईशान्येकडून राहील.
पश्चिम महाराष्ट्र
कमाल तापमान सातारा, सोलापूर व नगर जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस, तर कोल्हापूर, सांगली व पुणे जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान कोल्हापूर जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, सातारा व सांगली जिल्ह्यांत २० ते २१ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर व नगर जिल्ह्यांत ते १८ ते १९ अंश सेल्सिअस आणि नगर जिल्ह्यात ते १७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर जिल्ह्यात ८१ टक्के, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांत ६० ते ७२ टक्के, पुणे व नगर जिल्ह्यात ५७ ते ५८ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत ४० ते ५० टक्के व सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत २५ ते ३३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ७ ते १० कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेय व ईशान्येकडून राहील.
कृषी सल्ला ः
- भुईमूग पिकाची काढणी करावी. शेंगा ४ ते ५ दिवस उन्हात चांगल्या वाळवाव्यात.
- गव्हाची पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत आणि हरभऱ्याची पेरणी १० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावी.
- लसूण घास, बरसीम या चारा पिकांची पेरणी १५ नोव्हेंबरपर्यंत करावी.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.