सहा महिन्यांपासून रोहित्र दुरुस्तीची प्रतीक्षा
ॲग्रोवन वृत्तसेवा
सिन्नर, जि. नाशिक : दुशिंगपूर (ता. सिन्नर) येथील गोराणे वस्तीवर गेल्या सहा महिन्यांपासून नादुरुस्त रोहित्र (Rohitra) वारंवार मागणी करूनही बदलून दिले जात नसल्याने येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. येत्या दोन दिवसांत जळालेले रोहित्र बदलून न दिल्यास सिन्नर-शिर्डी रस्त्यावर वावी येथे ‘रास्ता रोको’ करण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला.
रोहित्र जळाल्याची तक्रार करूनही केवळ वीजबिल भरले नाही; म्हणून तो बदलून दिला जात नसल्याने येथील १३ जोडणीधारक शेतकरी ६ महिन्यांपासून विजेचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे. पावसात येथील वीज वाहिन्याही पडल्या आहेत. यापूर्वी दुष्काळामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगाम घेता आला नाही. तर जोरदार पावसाने खरीप हंगामही वाया गेला.
यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम पिकविण्यासाठी तयारी सुरू केली; मात्र या भागात वीजपुरवठा उपलब्ध नसल्याने शेती करायची कशी, पिकांना पाणी द्यायचे कसे. असा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे आता रोहित्र येत्या दोन दिवसांत बदलून न दिल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा सरपंच कानिफनाथ घोटेकर, शेतकरी नंदू गोराणे, सुनील गोराणे, सुभाष सरोदे, रावसाहेब सरोदे, चंद्रभान गोराणे, संजय कहांडळ, कैलास सरोदे, शिवाजी गोराणे, बापू गोराणे, निवृत्ती गोराणे आदी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला. थकीत वीजबिलाच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांच्या शेतातील वीज न तोडण्याचे आदेश आयोगाने महावितरणला दिले आहेत; मात्र त्या आदेशाची पायमल्ली येथील वावी उपकेंद्राकडून
सुरू आहे.
पावसाळ्याचे सहा महिने वस्त्यांवर घरगुती वीजपुरवठा बंद राहिला. या काळातदेखील महावितरणकडून देयके पाठवण्यात आली. वीजपंपांच्या थकबाकीपोटी तेरा शेतकऱ्यांनी ६५ हजार रुपये भरले; मात्र अद्याप कार्यवाही नाही. - चंद्रभान गोराणे, शेतकरी
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.