
Ratnagiri News : हापूस आंब्यावरील थ्रिप्सचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, पणन आणि जिल्हा परिषद अशी चारही यंत्रणा एकत्रित काम करण्याचा निर्णय दापोली येथील बैठकीत झाला.
थ्रिप्सविरोधातील विद्यापीठाचे तंत्र रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील प्रत्येकी दोन गावांतील शंभर टक्के बागांमध्ये राबवले जाणार आहे. विद्यापीठाचे दोन शास्त्रज्ञ यासाठी नियुक्त केले जाणार असून ऑक्टोबरमध्ये त्याची सुरुवात केली जाईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी दिली.
पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकाराने मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आंबा बागायतदारांची बैठक झाली. त्यामध्ये आंबा बागांवरील थ्रिप्सचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्याचीच मागणी बागायतदारांनी केली होती. मुख्यमंत्र्यांनी विद्यापीठाला या बाबत योग्य त्या उपाय सुचवण्याची सूचना केली होती.
त्यानुसार शुक्रवारी (ता. १५) दापोली येथे कृषी विद्यापीठात शास्त्रज्ञ आणि आंबा बागायतदारांची बैठक झाली. या वेळी कुलगुरू डॉ. भावे यांच्या मार्गदर्शनाखाली आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष प्रदीप सावंत, प्रसन्न पेठे, दत्ताराम तांबे, अरविंद मांडवकर, उमग साळवी, अविनाश गुरव, प्रमोद सावंत, डॉ. पराग हळदणकर, कीटकशास्त्रज्ञ डॉ. विनायक जालगावकर, कृषी विभागाचे अधिकारी अंकुश माने यांच्या उपस्थितीत बैठक झाली.
मागील दहा ते बारा वर्षांत थ्रिप्समुळे आंबा बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. गतवर्षी सुरुवातीला हापूस कलमांना मोहोर आलेला नव्हता, उशिराने आला. त्यामुळे उत्पादन थोडेफार मिळेल अशी आशा होती; परंतु थ्रिप्सने मोहोरच वाया गेला. हजार पेट्या मिळणाऱ्या बागायतदारांना अवघ्या चारशेच पेट्या मिळाल्या. काही ठिकाणी बारीक कैरीवर थ्रिप्सच्या ॲटॅकमुळे मोठा फटका बसला.
कीटकनाशकाचा अपेक्षित परिणाम होत नसल्यामुळे चार लाखांचा खर्च दहा ते बारा लाखांवर पोहोचला आहे, असे मुद्दे बागायतदारांनी बैठकीत मांडले. थ्रिप्सवर कीटकनाशक शोधावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच विद्यापीठ, कीटकनाशक कंपन्या, बागायतदार यांची संयुक्त बैठक रत्नागिरीत घेण्यात यावी अशीही सूचना करण्यात आल्याचे सावंत यांनी सांगितले.
त्यानुसार विद्यापीठाने थ्रिप्सचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील दोन गावांत विद्यापीठाने विकसित केलेले तंत्र राबविण्यात येणार आहे. याची सुरुवात ऑक्टोबर महिन्यात केली जाईल. फुलकिडी येऊच नये यासाठी विद्यापीठाने बनवलेले रक्षक सापळे बागांमध्ये लावण्यात येतील.
शास्त्रज्ञांनी दिलेले तंत्र बागायतदारांनी अवलंबायचे असून, त्यावर कृषी विभागाकडून निरीक्षण ठेवले जाईल. जिल्हा परिषदेकडून रक्षक सापळे, कीटकनाशके अनुदानावर बागायतदारांना उपलब्ध करून देईल. तर पणन मंडळ बागायतदारांना विक्रीसंदर्भातील मार्गदर्शन करेल. या पद्धतीने चारही यंत्रणा एकत्रितपणे काम करणार असल्याचे डॉ. भावे यांनी सांगितले. यासाठी गावातील शंभर टक्के बागांमध्ये त्याची योग्य अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.