
Ratnagiri News : उच्चतम तापमान, अवेळीचा पाऊस आणि नीचांकी तापमान याचा परिणाम आंबा, काजू उत्पादनावर झाला आहे. जिल्ह्यातील २२ हजार ४८८ बागायतदार फळपीक विमा योजनेत सहभागी झाले आहेत.
विमा योजनेचा कालावधी संपून अडीच महिने झाले तरीही विमा कंपन्यांकडून परतावा जाहीर करण्यात आलेला नाही. केंद्र आणि राज्य शासनाचा हप्ता अद्याप मिळाला नसल्याने विमा परताव्यासाठी विलंब होत आहे. त्यामुळे बागायतदारांमध्ये संताप आहे.
नैसर्गिक आपत्तीमुळे पीक उत्पादनावर परिणाम होत असल्याने हवामानावर आधारित फळपीक विमा योजना केंद्र शासनाने जाहीर केली. त्यावेळी अवेळी पावसासाठी १ डिसेंबर ते १५ मे, कमी तापमानासाठी १ जानेवारी ते १५ मार्च, जास्त तापमानासाठी १ मार्च ते १५ मे आणि गारपिटीसाठी १ फेब्रुवारी ते ३१ मे असा कालावधी जाहीर करण्यात आल्याने विमा कालावधी डिसेंबर ते मेपर्यंत होता.
जिल्ह्यातील १८ हजार ७०८ आंबा व ३ हजार ७८० काजू उत्पादकांनी मिळून एकूण १४ हजार हेक्टर क्षेत्रासाठी विमा उतरविला. शेतकऱ्यांनी प्रीमियमसाठी २१ कोटी ७८ लाख ३५ हजार ९५० रुपये भरले. विमा कालावधी संपून दोन महिने २२ दिवस झाले. मात्र अद्यापही विमा परताव्याची रक्कम बागायतदारांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. विमा कंपनीकडे शेतकऱ्यांच्या हप्त्याची रक्कम जमा झाली आहे.
यावर्षी हवामानातील बदलामुळे आंबा पीक अत्यल्प होते. त्यातच अवकाळी पाऊस, उच्चतम तसेच नीचांकी तापमानामुळे उत्पन्न जेमतेमच होते. डिसेंबर व जानेवारीत झालेल्या अवेळी पावसाचा फटका पिकाला बसला. तसेच फेब्रुवारी मार्चमध्ये उच्चतम तापमानामुळे पिकांचे नुकसान झाले. महसूल मंडलांतील ट्रीगरद्वारे नोंद होऊन बागायतदारांना परतावा मिळणे आवश्यक आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.