
शिरपूर जैन, जि. वाशीम ः हळद उत्पादनासाठी (Turmeric Production) जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या शिरपूर भागात गेल्या काळातील वातावरण बदल (Climate Change), सततचे धुके (Fogg) पडल्याने हे पीक अचानक काही ठिकाणी वाळत असल्याचे दिसून आले आहे. यामुळे हळद उत्पादनावर परिणाची चिंता शेतकऱ्यांना भेडसावत आहे.
हळदीचे पीक पूर्ण होण्यास जवळपास एक ते दीड महिना कालावधी शिल्लक असताना हळदीच्या पिकाची पाने वाळली आहेत. वेळेआधी वाळणाऱ्या पानांमुळे उत्पादनाला फटका बसू शकतो.
शिरपूर व परिसरात मसाला वर्गीय व नगदी पीक म्हणून मान्यता असलेले हळदीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतात हळदीची लागवड केली जाते.
यंदाचे पीक तयार व्हायला अजून एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. अशातच गेल्या काही दिवसांत वातावरणात झालेले बदल, सतत पडलेल्या धुक्यामुळे हळदीची पाने वाळून गेली.
आधीच अतिवृष्टीने सोयाबीन, उडीद, मूग या पिकांचे नुकसान झाले होते. त्यानंतर तुरीवर देखील बदलत्या वातावरणाचा परिणाम होऊन तुरीचे पीकही पूर्ण होण्याआधीच वाळले. त्याचा उत्पादनावर थेट परिणाम दिसून आला. आता हळदीचेही असेच होते की काय अशी शंका निर्माण झाली.
थंडीची लाट अचानक आली आणि तापमान घटले तर वनस्पती वाळतात. जेथे सिंचन केलेले असेल तेथे हा परिणाम होत नाही. मात्र, पीक कोरडे असेल तर अशा प्रकारे पीक वाळू शकते. यावर तत्काळ कोणताही उपाय करणे शक्य राहत नाही. जेथे पीक हिरवे असेल त्या भागात आता सिंचन केले पाहिजे. तसेच बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी.
- प्रा. डाॅ. विजय काळे, उद्यानविद्या विभाग, डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.