
Solapur News : पावसाळा सुरू असतानाही ऑगस्टमध्ये सरासरीच्या १५ टक्केसुद्धा पाऊस पडलेला नाही. जिल्ह्यात ऊस वगळता तीन लाख २५ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. त्यात तूर, मूग, उडीद, मका, सोयाबीन, सूर्यफूल व भुईमुगाचा समावेश आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांनी कांदा लागवडीची तयारी केली आहे, पण रोपांनाही पाण्याची ओढ बसत आहे.
यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने जमिनीची पाणीपातळी देखील वाढलेली नाही. जिल्ह्याची वरदायिनी उजनी अजून समाधानकारक स्थितीत नाही. तसेच जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांनी देखील तळ गाठला आहे. पाऊस न पडल्यास पावसाळ्यात दुष्काळी स्थिती निर्माण होईल, अशी भीती वर्तविली जात आहे.
जिल्ह्यातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, बार्शी, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ, उत्तर सोलापूर यासह इतर तालुक्यांमध्ये यंदा तीन लाख २५ हजार १८३ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. त्यातील तीन लाख हेक्टर क्षेत्र कोरडवाहू (हंगामी बागायत) आहे.
प्रत्येक तालुक्यांच्या लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांची चिंता पाहून खरीप पिकांना उजनीतून एक आवर्तन सोडण्याची मागणी करणे अपेक्षित आहे. पण, बहुतेक आमदारांनी अद्याप लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाकडे तशी मागणी केलेली नाही.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.