
नाशिक : ऊस उत्पादक शेतकरी (Sugarcane farmers ) यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्यभर १७ आणि १८ नोव्हेंबरला ऊस तोडणी व वाहतूक बंद ठेवण्याचे आंदोलन पुकारले होते. यासंबंधी रानवड सहकारी साखर कारखाना प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
त्या वेळी त्यांना वाहतूक बंद करण्याचे आश्वासन कारखाना प्रशासनाने दिले होते; मात्र ते न पाळल्याने निफाड तालुक्यातील व परिसरातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (ता. १८) दुपारी ३.३० वाजता चितेगाव फाटा परिसरात ऊस वाहने रोखून त्यांची हवा सोडली.
या वेळी वाहतूकदार व कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. या वेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याबाबत संघटनेचे कार्यकर्ते राम राजोळे यांनी सांगितले, की कारखानदार आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र कारखानदारांचे षडयंत्र यशस्वी होऊ देणार नाही. साखर ३५ रुपये प्रति किलो आणि इथेनॉल ६५ रुपये लिटर व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
एकरकमी ‘एफआरपी’ मिळालीच पाहिजे, तोडणी मजूर महामंडळ झालेच पाहिजे, साखरेचा भाव ३५ रुपये झालाच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राम राजोळे, गणेश दाभाडे, रूपेश पगार, गणेश गंधे, माणिक कुटे, शेतकरी सुदर्शन राजोळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमले होते.
तर साखर सम्राटांनापायदळी तुडवू
शेतकरी वाहतूकदार, मजूर आणि साखर मागण्यासाठी संघर्ष करत आहोत. आता कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक करणारी वाहने रोखण्यात आली. दरम्यान आंदोलन मोडीत काढण्याचे साखर सम्राटांचे षड्यंत्र यशस्वी होऊ देणार नाही. प्रसंगी साखर सम्राटांना पायदळी तुडवू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या वेळी दिला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.