
1. कापूस वायद्यांमध्ये आज चांगली वाढ झाली होती. देशातील वायदे आज दुपारपर्यंत ५६० रुपयांनी वाढले होते. तर आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस वायद्यांनी ८८ सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा पार केला होता. जागतिक बाजारात कापसाला वाढलेली मागणी आणि कापूस उत्पादन घटीचा अंदाज यामुळे कापूस दर तेजीत दिसतात. सध्या बाजारातील कापूस आवक मंदावलेली आहे. तरीही कापूस भाव ७ हजार ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान आहेत. कापसाच्या भावात यंदा चांगली तेजी राहू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
2. देशातील बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात चढ उतार सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात आजही सोयाबीनच्या भावात काहीशी वाढ झाली होती. देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी ४ हजार ४०० ते ५ हजारांचा भाव मिळत आहे. प्रक्रिया प्लांट्सचे भावही ५ हजार ते ५ हजार १५० रुपयांच्या दरम्यान आहेत. सोयाबीनच्या दरातील चढ उतार आणखी काही दिवस दिसू शकतात, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
3. राज्यातील बाजारात हिरव्या मिरचीचे भाव तेजीत आहेत. बाजारातील मिरचीची आवक मर्यादीत दिसते. मिरची पिकावर ऑगस्ट महिन्यात पडलेल्या पावसातील खंडाचा मोठा परिणाम झाला, असे शेतकऱ्यांनी सांगितले. बाजारात मिरीचीची आवक मर्यादीत असल्याने भाव मात्र चांगला मिळत आहे. हिरव्या मिरचीला सध्या प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ते ३ हाजर ५०० रुपयांचा भाव मिळत आहे. हिरव्या मिरचीचा भाव आणखी काही दिवस तेजीतच राहू शकतो, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
4. बाजारातील आवक घटल्याने लसणाच्या भावात चांगलीच वाढ झाली. मागील काही दिवसांपासून लसणाची आवक कमी होत गेली आहे. पण उठाव टिकून आहे. यामुळे लसणाला प्रतिक्विंटल सरासरी ११ हजार ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळत आहे. लसणाच्या भावाता झालेली वाढ आणखी काही दिवस टिकून राहू शकते, असा अंदाज लसूण बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
5. देशातील अनेक बाजारात तुरीच्या भावात पुन्हा वाढ होत आहे. सणांच्या पार्श्वभुमीवर तुरीला मागणी वाढली. तूर, उडीद आणि मुगाचे भाव वाढल्यामुळे हरभराही वाढला. यामुळे तुरीच्या भावाला आणखी आधार मिळाला. हरभऱ्याचे भाव स्थिर असते तर तुरीच्या भाववाढीला एवढा आधार मिळाला नसता. पण एकूणच कडधान्य बाजारातील समिकरण तेजीचं बनलं आहे. त्यातच महत्वाच्या तूर उत्पादक महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमधील पिकाला मोठा फटका बसला आहे. परिणामी उत्पादन घटीचा अंदाज आतापासून लागवला जात आहे. यामुळे तुरीचे भाव आता १२ हजारांवर पोचले. महाराष्ट्रातील लातूर आणि अकोला तसेच खामगाव बाजारात तुरीच्या भावाने १२ हजारांचा टप्पा पार केला. गुणवत्तेच्या मालाचे भाव यापेक्षा अधिक आहेत. तर देशातील तुरीचे सरासरी भाव ११ हजार ते १२ हजारांच्या दरम्यान आहेत. पुढील दोन महिने तुरीला सणांमुळे चांगली मागणी राहणार आहे. पण आफ्रिकेतील तूरही आयात होण्याला सुरुवात होईल. त्यामुळे देशातील बाजारात तुरीची उपलब्धता काही प्रमाणात वाढलेली दिसेल. पण बाजारावर या आयातीचा फार मोठा दबाव येण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे पुढील काळातही तुरीचे भाव तेजीतच राहू शकतात, असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.