कोल्हापूर : ऑक्टोबरच्या शेवटच्या सप्ताहापासून राज्यात पावसाने पूर्णपणे विश्रांती दिल्याने साखर कारखान्यांना (Sugar Mill) मोठा दिलासा मिळाला आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या सप्ताहाअखेर राज्यातील ८६ साखर कारखान्यांनी गाळप (Sugarcane Crushing) सुरू केले असले, तरी नागपूरमध्ये अद्याप एकही कारखाना सुरू झालेला नाही. सध्या वाफसा येण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने ऊसतोडणी (Sugarcane Harvesting) येत्या पंधरा दिवसांत गती घेण्याची शक्यता आहे.
नागपूर वगळता इतर सर्व सात विभागांतील कारखाने सुरू झाले आहेत. थंडीचे प्रमाण कमी जास्त असले, तरी ऑक्टोबरमध्ये असणारी ६ टक्क्यांची रिकव्हरी वाढून आता ७ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. ऑक्टोबरमध्ये केवळ १२ लाख टन उसाचे गाळप झाले होते. पुढील पाच दिवसांत गाळपाचा वेग वाढून गाळत ३४ लाख टनांवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी हंगाम लांबलेल्या मराठवाड्यात अद्याप यंदाचा हंगामही पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही.
विभागनिहाय धुराडी पेटलेल्या कारखान्यांची संख्या
कोल्हापूर २६
सोलापूर २४
पुणे १९
औरंगाबाद ३
नांदेड ३
अमरावती १
५ नोव्हेंबरअखेर नागपूरमध्ये मात्र एकही कारखाना सुरू झाला नव्हता.
पुणे विभागाची ऊस गाळपात आघाडी
पुणे विभागाने प्रारंभीच्या कालावधीत ऊस गाळपात आघाडी घेतली असून, पुणे विभागात ५ नोव्हेंबरअखेर १२ लाख टन साखरेचे गाळप झाले आहे. या खालोखाल कोल्हापूर विभागात ९.७८ लाख टन उसाचे गाळप झाले. सोलापूर विभागात ८ तर नगर विभागात ३.५ लाख टन उसाचे गाळप झाले.
औरंगाबाद, नांदेड, अमरावती, नागपूर विभागांतून अद्याप एक लाख टनदेखील ऊसगाळप झालेला नाही. गेल्या वर्षी मराठवाड्यातील एकूण ३१ कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. यंदा यापैकी आतापर्यंत केवळ ७ कारखाने सुरू झाले आहेत. यामुळे मराठवाड्यातील हंगाम यंदाही लांबण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रिकव्हरीत वाढ होण्यास सुरुवात
सध्या राज्यात थंडीचे प्रमाण कमी-जास्त आहे. आता माळरानावरील ऊस तोडणीस प्रारंभ झाला आहे. रिकव्हरीतही सुधारणा होत आहे. कोल्हापूर विभागाने रिकव्हरीत आघाडी घेतली आहे. कोल्हापूरची रिकव्हरी ७.९६ टक्के म्हणजे जवळ जवळ ८ पर्यंत पोहोचली आहे. खालोखाल पुण्याची रिकव्हरी ७.३४ टक्क्यापर्यंत आहे. सोलापूर व नगरमध्ये मात्र अद्याप रिकव्हरीने ६ चा टप्पा ओलांडला नाही. राज्याची सरासरी रिकव्हरी ५ नोव्हेंबरअखेर ७.२९ टक्क्यांची आहे.
गेल्या वर्षाच्या तुलनेत गळीत हंगाम मागेच
गेल्या वर्षीच्या तुलनेत मात्र यंदा गळीप हंगामात राज्य मागे आहे. गेल्या वर्षी ५ नोव्हेंबरअखेर तब्बल १२० कारखाने सुरू झाले होते. कारखान्यांनी ४५ लाख टन उसाचे गाळप केले होते. यंदा या कालावधीत ३४ लाख टन गाळप झाले आहे. सध्या राज्यात ऊस तोडणीसाठी अनुकूल वातावरण असल्याने नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत ऊसतोडणीस गती येण्याची शक्यता आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.