
Nagpur Soybean Production : देशात मॉन्सूनचे आगमन (Monsoon) लांबणीवर पडले असले तरी जूनअखेरपर्यंत तो पडला तरी सोयाबीन लागवड क्षेत्रात कोणत्याच प्रकारची घट न होता क्षेत्र सरासरी इतकेच राहील, अशी अपेक्षा इंदूर येथील केंद्रीय सोयाबीन संशोधन संस्थेचे संचालक डॉ. के. एच. सिंग यांनी व्यक्त केली.
सोयाबीन लागवडीसाठी १० जुलैपर्यंत वातावरण पोषक असून त्यानंतर मात्र सोयाबीन न लावण्याचा सल्ला त्यांनी दिला.
डॉ. सिंग यांनी ‘ॲग्रोवन’ला दिलेल्या माहितीनुसार, देशात सुमारे १२ दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची लागवड होते. कापसानंतर देशातील हे दुसरे मुख्य आणि तेलबियावर्गीय पीक आहे. देशात गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांना वातावरणातील बदलाला सामोरे जावे लागत आहे.
त्या पार्श्वभूमीवर संस्थेने या क्षेत्रात संशोधनाची दिशा बदलत दुष्काळी परिस्थितीत तग धरतील अशा वाणांचे संशोधन आणि विकासावर भर दिला आहे.
फुडग्रेन म्हणून सोयाबीनला मान्यता मिळावी याकरिता संस्था प्रयत्नशील आहे. देशाचे हे मुख्य तेलबियावर्गीय पीक असल्याने त्याच्या उत्पादकतेवर परिणाम झाल्यास देशातील प्रक्रिया उद्योगावर याचा परिणाम होतो.
यंदा मॉन्सूनच्या पावसाने दडी मारली आहे. सोयाबीन उत्पादकही यामुळे चिंतीत आहेत. परंतू जूनअखेरपर्यंत पेरणीयोग्य पाऊस झाल्यास आणि कमी कालावधीचे वाण लागवड केल्यास उत्पादकतेत कोणताच फरक पडणार नाही.
एकदा पावसाला सुरुवात झाल्यानंतर समाधानकारक पाऊस असल्याचा अंदाज सध्यातरी हवामान खाते आणि संबंधित यंत्रणांकडून वर्तवण्यात आला आहे. पावसाला आणखी विलंब झाला तर १० जुलैपर्यंत पेरणीचा निर्णय घेता येईल.
त्यानंतर मात्र शेतकऱ्यांनी पेरणी टाळणेच योग्य राहील, असा सल्ला डॉ. एच. के. सिंग यांनी दिला. जूनमध्येच पाऊस झाला तर सोयाबीनखालील क्षेत्र सरासरी इतकेच म्हणजे १२ दशलक्ष हेक्टर राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
देशांतर्गत सोयाबीनचा कॅरीऑन स्टॉक २५-३० लाख टन इतकाच उरला आहे. परिणामी प्रक्रिया उद्योजकांची चिंता वाढली आहे. देशात १५० प्रक्रिया उद्योग असून त्यांची क्षमता अधिक असली तरी देशाची उत्पादकता कमी असल्याने ते आधीच पूर्ण क्षमतेने चालत नाहीत.
सध्या मॉन्सूनला विलंब झाला असला तरी सोयाबीनची पेरणी जुलैपर्यंत करता येणार आहे. परिणामी चिंतेचे कारण नाही.
- डी. एन. पाठक, मुख्य कार्यकारी अधिकारी, सोयाबीन प्रोसेसर ऑफ इंडिया
पाऊसमान बदलल्याने १५ व जास्तीत जास्त २० जुलैपर्यंत पेरणी करता येते. परंतु पेरणीचा कालावधी लांबल्यास उत्पादकतेत घट होते, असे निष्कर्ष आहेत.
- मंगेश दांडगे, कृषी विद्यावेत्ता, प्रादेशिक सोयाबीन संशोधन केंद्र, अमरावती.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.