Aannabhau Sathe : नेर्ले, जि. सांगली ः महाराष्ट्र सरकारने आतातरी डोळे उघडावे. अण्णा भाऊ साठे यांना आजपर्यंत सरकारने वंचित ठेवले. हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. अण्णा भाऊ साठे यांनी कायम शोषित आणि वंचित माणसांबाबत लेखन केले. भारताच्या दृष्टीने ते मॅक्झिम गॉर्की आहेत, असे रशियाने म्हणले आहे. या पावन धरतीला नम्रपणे मी प्रणाम करतो. अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य देशभरातील विविध भाषांत प्रकाशित व्हावे, असे मत तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री भारत राष्ट्र समितीचे संस्थापक के. चंद्रशेखर राव यांनी व्यक्त केले.
वाटेगाव (ता. वाळवा) येथे लोकशाहीर डॉ. अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या जाहीर सभेत केसीआर बोलत होते. या वेळी अण्णा भाऊ साठे यांच्या सून सावित्रीमाई साठे अध्यक्षस्थानी होत्या. अण्णा भाऊ यांचे नातू सचिन साठे, शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील, योगेश साठे, रवींद्र बर्डे, देवराज पाटील, भारत राष्ट्र समितीचे सांगली जिल्हा समन्वयक बी. जी. पाटील, मनोहर गायकवाड उपस्थित होते.
या वेळी केसीआर म्हणाले, की अण्णा भाऊ साठे हे कधीच मागे हटले नाहीत. रशिया सरकारने अण्णा भाऊंचा सन्मान केला नाही. महाराष्ट्र सरकार व भारताने त्यांचा सन्मान केला नाही. गाजलेले व्यक्तिमत्त्व झाकण्याचे काम करण्यात आले. संपूर्ण हिंदुस्थानात विविध भाषांत अण्णा भाऊंचे साहित्य प्रकाशित करायला हवे. यासाठी मी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पत्रव्यवहार करेन. तेलंगणा सरकार अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळवण्यासाठी शिफारस करेल त्याच पद्धतीने शिंदे सरकारनेदेखील अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळण्यासाठी शिफारस करावी.
सचिन साठे, म्हणाले, की केसीआर यांच्या पाठीशी संपूर्ण समाज उभा राहील. अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा. मातंग समाजाला राजकीय स्थान मिळावे. समाजाची एकजूट हवी.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.