
Pune News : राज्यातील उसाचा गाळप हंगाम (Sugarcane Crushing Season) जवळपास समाप्त होत आलेला असताना शेतकऱ्यांची एफआरपी (Sugarcane FRP) थकविणाऱ्या काही कारखान्यांवर जप्तीची कारवाई करावी, अशी आग्रही मागणी स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी साखर आयुक्तांकडे केली.
श्री. शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी (ता. २८) साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली. ‘‘राज्यात अनेक साखर कारखान्यांकडून आगाऊ रक्कम घेत मुकादमांनी कारखान्यांची फसवणूक केली आहे.
त्यांना काळ्या यादीत टाकावे. त्यामुळे पुढील हंगामात फसवाफसवीचे प्रकार होणार नाहीत, असे शिष्टमंडळाचे म्हणणे होते.
तसेच कायद्यानुसार उसाची खरेदी केल्यानंतर १४ दिवसांच्या आत एफआरपीचे पेमेंट शेतकऱ्यांना अदा करावे लागते. मात्र अनेक कारखान्यांनी एफआरपी अदा केलेली नाही. त्यामुळे या कारखान्यांवर आरआरसी कारवाई करावी. त्यामुळे कारखान्यांच्या मालमत्ता जप्त करून शेतकऱ्यांची थकीत देणी देता येईल, असे श्री. शेट्टी यांनी चर्चेत सांगितले.
सुस्त पडलेल्या ऊसदर नियंत्रण समितीचा मुद्दाही या बैठकीत मांडण्यात आला. वारंवार मागणी करून देखील समितीच्या सदस्यांची निवड करण्यात आलेली नाही. शासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यास प्रतिसादही दिला जात नाही, अशी तक्रार श्री. शेट्टी यांनी केली.
गाळप हंगाम शेवटाकडे असल्यामुळे गाळपाअंती उसाचा हिशेब होऊन अंतिम ऊस दर उत्पादकांना मिळणे अपेक्षित आहे. अशा स्थितीत ऊसदर नियंत्रण समिती कार्यरत असणे गरजेचे असूनही शासनाने दुर्लक्ष केलेले आहे, असे निवेदन साखर आयुक्तांना देण्यात आले.
चालू गाळप हंगामात राज्यातील कारखान्यांना साखरेसह इथेनॉल व इतर उपपदार्थांना चांगला दर मिळालेला आहे. मात्र त्याचे लाभ शेतकऱ्यांना तत्काळ देण्यास कारखाने चालढकल करीत आहेत. त्यामुळे या साखर कारखान्यांचे लेखापरीक्षण करून अंतिम दर तातडीने निश्चित करावेत, असे श्री. शेट्टी यांचे म्हणणे आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.