
Nagar News : राज्यात गेल्यावर्षी झालेला चांगला पाऊस, सिंचन क्षमता वाढीसाठी केल्या जाणाऱ्या प्रयोगांचे परिणाम दिसत आहेत. यंदा राज्यात उन्हाळी पिकांची (Summer Crop) सुमारे २ लाख ८१ हजार ९६८ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
गेल्यावर्षी २ लाख २ हजार ३९२ क्टरवर पेरणी (Summer Sowing ) झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत त्यात ८० हजार हेक्टरने वाढ झाली आहे. उन्हाळी क्षेत्राच्या सरासरीचा विचार करता सरासरीपेक्षा पेरणी कमी आहे.
राज्यात रब्बीसोबत भात, मका, ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, भुईमूग, सूर्यफूल, तीळ, सोयाबीन उन्हाळी पिकेही घेतली जात आहेत. मागील काळात पाण्याच्या टंचाईमुळे उन्हाळी पिकांचे क्षेत्र कमी झाले होते. मात्र अलीकडच्या काळात चांगला पाऊस, पाणी सिंचन वाढीसाठी केलेल्या विविध प्रयोगांमुळे या पिकांच्या क्षेत्रात वाढ होत आहे.
राज्यात उन्हाळी पिकांचे ३ लाख ४९ हजार ७५९ सरासरी क्षेत्र आहे. यंदा २ लाख ८१ हजार ९६८ हेक्टरवर पेरणी झाली. त्यात उन्हाळी भाताची १ लाख ४८ हजार ८१८ हेक्टरवर लागवड होऊन त्याचे सरासरी ८३,०११ हेक्टर क्षेत्र आहे. गेल्यावर्षी उन्हाळी उन्हाळी भाताची ३७ हजार ९९४ हेक्टरवर पेरणी झाली होती. यंदा गेल्यावर्षीपेक्षा नऊ पट क्षेत्र वाढले आहे.
मक्याची ३३ हजार ७६९, ज्वारीची ६११० व बाजरीची २१ हजार ३८२ हेक्टरवर, सोयाबीनची १५०१० हेक्टरवर यंदा पेरणी झाली आहे. सोयाबीनचे २३ हजार ३५५ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. गेल्यावर्षी ज्वारी, बाजरी, सोयाबीनची पेरणी झाली नव्हती. मुगाची ४४७१, उडदाची ३०० हेक्टरवर तर भुईमुगाची ४२ हजार १४८ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
भूईमुगाचे ९० हजार ६०५ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. सूर्यफुलाची ३३८२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा भुईमूगही दुपटीने वाढला आहे. राज्यात सरासरीच्या ८२ टक्के पेरणी झाली आहे. उन्हाळी पिकांचे क्षेत्र अजून वाढण्याची शक्यता आहे, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
गोंदिया, भंडाऱ्यात सर्वाधिक क्षेत्र
राज्यात उन्हाळी पेरणीत अमरावती विभागात सर्वाधिक आणि त्यात गोंदिया, भंडारा जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र आहे. गोंदिया जिल्ह्यात ७१ हजार ३३४ हेक्टर, भंडाऱ्यात ५८ हजार ६८८ हेक्टर, गडचिरोलीत १० हजार १४२ हेक्टर, बीडमध्ये १० हजार ५५८ हेक्टर, यवतमाळमध्ये ९ हजार २३५, परभणीत ६ हजार ५१२, नांदेडमध्ये ९ हजार २६४ हेक्टर, सोलापुरात १० हजार ५६९ हेक्टर, जळगाव जिल्ह्यात १२ हजार ८१९, पुणए जिल्ह्यात ९ हजार ८६० हेक्टरवर पेरणी झाली आहे. नगर जिल्ह्यात मात्र क्षेत्र फारच कमी आहे. यंदा केवळ २९३४ हेक्टरवर उन्हाळी पिके असून सरासरीच्या केवळ ३३ टक्के त्यांची पेरणी झाली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.