
Grape Export News नाशिक : जिल्ह्यातून बांगलादेशात मोठ्या प्रमाणात द्राक्ष निर्यात (Grape Export) होते. त्यामुळे येथे होणाऱ्या द्राक्ष वाहतुकीसाठी किसान रेल्वे (Kisan Railway) सुरू करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वतीने मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाकडे पत्राद्वारे केली होती.
त्यावर २४ जानेवारी रोजी रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये सात प्रमुख मागण्या होत्या. त्यावर रेल्वेकडून काही मुद्द्यांवर अनुकूलता दाखविण्यात आली आहे. मात्र काही मागण्या अजूनही प्रलंबित आहेत.
मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाच्या वाणिज्य विभागाकडून पत्राद्वारे उत्तर कळविण्यात आले आहे. बांगलादेशला द्राक्ष निर्यात करण्यासाठी किसान रेल्वेसाठी द्राक्ष मालाच्या लोडिंगचे केंद्र कुंदेवाडी (ता. निफाड) हे रेल्वे स्थानक असावे.
ही गाडी लोडिंगसाठी दुपारी ३ ते रात्री १० पर्यंत उपलब्ध करून द्यावी. रेल्वे रात्री १० वाजता निघून ३० ते ३२ तासांत भारत-बांगलादेशच्या मालदा गौरबंगा किंवा बनगाव स्थानकावर पोहोचावी, अशी मागणी होती.
यावर रेल्वेकडून किसान रेल्वेचे नियोजन मध्य रेल्वेच्या अधिकार क्षेत्रात येते. परंतु कुंदेवाडी रेल्वे स्थानक वाहतुकीसाठी खुले आहे. मात्र शेतकरी, व्यापाऱ्यांनी आगाऊ मागणी नोंदविल्यास उपलब्धतेनुसार सेवा पुरविण्यासह रेल्वे वाहतूक केली जाईल, असे सांगितले आहे.
किसान रेल्वेमुळे मालवाहतूक खर्च कमी होईल. बाजारपेठेत ताजे द्राक्ष पोहोचल्यास दराचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळेल, अशी मागणी होती.
त्यावर शेतकरी, व्यापाऱ्यांनी सामूहिक पद्धतीने १५ ते २० पार्सल व्हॅन रेकची आगाऊ मागणी नोंदविल्यास किसान रेल्वेप्रमाणे फायदा घेता येईल, असे रेल्वेने कळविले आहे.
मार्च व एप्रिल महिन्यांतील तापमान बघता बांगलादेशसाठी थेट वातानुकूलित रेल्वे बोगी मिळावी, अशी मागणी होती. या बाबत भारतीय रेल्वेकडे ७ वातानुकूलित पार्सल व्हॅन उपलब्ध आहेत.
मात्र वातानुकूलितसाठी राजधानी रेल्वेच्या दीडपट भाडे असल्याने रेल्वे वाहतुकीत फायदेशीर ठरणार नाही. सध्या नवीन पार्सल व्हॅन ज्यात व्हेन्टिलेशन जास्त आहे अशा रेल्वे बोगी पद्धतीची पार्सल व्हॅन सुविधा उपलब्धतेनुसार पुरविली जाईल, असे रेल्वेने नमूद केले आहे.
देशांतर्गत वाहतुकीसाठी पर्याय
द्राक्षांच्या देशांतर्गत वाहतुकीसाठी रेल्वे व्यवस्था पुरवावी, अशी मागणी द्राक्ष बागायदार संघाने केली होती. नाशिक व मनमाड रेल्वे स्थानकावरून वेगवेगळ्या दिशेने मार्गावरून रेल्वेला पार्सल व्हॅन जोडली जाऊ शकते.
त्यानुसार रेल्वेने उपलब्ध गाड्यांचे वेळापत्रक संघाला पत्रासोबत पाठविले आहे. ज्यामध्ये उत्तर पूर्व राज्य, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांसह अमृतसर, आग्रा, पटणा, चंडीगड व मदुराई परिसरातील बाजारपेठेत माल नेला जाऊ शकतो, असा पर्याय दिला आहे.
कृषी मंत्रालयाकडून किसान रेल्वेला दिले जाणारे अनुदान सध्या बंद आहे. त्यामुळे अडचणी आहेत. जानेवारी व फेब्रुवारीत तापमान काहीसे कमी असल्याने व्हेंटिलेशन बोगीद्वारे पुरवठा होऊ शकतो. मार्च व एप्रिलमध्ये तापमान अधिक असल्याने वातानुकूलित बोगी मिळावी. द्राक्ष उत्पादकांना निर्यात प्रोत्साहन देण्यासाठी केंद्राने रेल्वे विभागाच्या माध्यमातून पाठबळ द्यावे. मात्र सर्व मागण्या पूर्ण झाल्या तरच कामाची घडी बसेल.
- कैलास भोसले, उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.