
Mango Cultivation पुणे ः राज्यात फलोत्पादनाच्या (Horticulture) दुसऱ्या टप्प्यात सुरू असलेल्या घोडदौडीचे नेतृत्व आंबा (Mango) करतो आहे. इतर कोणत्याही फळबागांपेक्षा शेतकऱ्यांकडून विक्रमी आंबा लागवड (Mango Cultivation) केली जात आहे.
शेतकऱ्यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेतून (Employment Guarantee Scheme) १० मीटर × १० मीटर अंतरावर आंबा कलमांकरिता १.६७ लाख रुपये तर १० मीटर × १० मीटर अंतराकरिता २.२८ लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जात आहे. कोरोना कालखंडातदेखील शेतकऱ्यांनी आंबा लागवडीत खंड पडून दिला नाही.
त्यामुळे २०२०-२१ मध्ये १५२२५ हेक्टरवर आंबा बागा उभ्या राहिल्या. मात्र गेल्या वर्षात शेतकऱ्यांनी ही लागवड उच्चांकी म्हणजेच २०८२२ हेक्टरवर नेली. यंदादेखील २०२२-२३ चालू वर्षात फेब्रुवारीअखेर आंबा लागवडीने १९१०० हेक्टरचा टप्पा ओलांडला.
फलोत्पादन विभागातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, आंब्यापाठोपाठ राज्यात संत्री, काजू, मोसंबी व नारळ बागांच्या लागवडीला शेतकऱ्यांची पसंती दिली आहे. याशिवाय डाळिंब, चिकू, पेरू, कागदी लिंबाच्या बागादेखील वाढत आहेत.
राज्यात फलोत्पादनाचा पहिला टप्पा रोहयो फळबाग लागवडीच्या संकल्पनेतून १९८६ नंतर सुरू झाला. १९९० पासून सुरू झालेली फळबाग लागवड वेगाने पुढे सरकली; मात्र २०१० च्या दशकात लागवडीचा वेग मंदावला.
त्यामुळे २०११ पासून दहा वर्षांत राज्यात एकूण १.६५ लाख हेक्टरपर्यंत जाऊ शकली. मात्र २०२० पासून फलोत्पादनाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याचे मानले गेले. कारण २०२० ते २३ या तीन वर्षांत दीड लाख हेक्टरच्या पुढे फळबागा लावल्या गेल्या.
फळबागेसाठी रोहयोचे जॉबकार्ड असल्यास किमान ०.०५ हेक्टर शेतजमीन असली तरी अनुदान मिळते. मात्र शेतजमीन कितीही मोठी असली, तरी कमाल अनुदान फक्त दोन हेक्टरवरील बागांना दिले जाते.
शेतकऱ्याला तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने म्हणजेच पहिल्या वर्षी ५० टक्के, दुसऱ्या वर्षी ३० टक्के तर तिसऱ्या वर्षी अनुदानाची २० टक्के रक्कम थेट बॅंकेच्या खात्यात जमा केली जाते.
मात्र त्यासाठी बिगर कोरडवाहू भागात किमान ९० टक्के झाडे आणि कोरडवाहू भागात ७५ टक्के झाडे जगलेली असल्याचे आढळले पाहिजे, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.
शेतकऱ्यांच्या नव्या पिढीतील मुले फळशेतीत उतरल्यामुळे लागवड वाढली आहे. मात्र लागवड वाढत असली तरी निरोगी लागवड साहित्य व निर्यातक्षम विविध वाणांची कमतरता आहे. तसेच फळबागांसाठी सिंचन, वीज, अर्थसाह्य या बाबी सरकारने सुरळीतपणे चालू ठेवायला हव्यात.
- सोपान कांचन, अध्यक्ष, अखिल भारतीय फलोत्पादन महासंघ
राज्यात नव्याने उभारल्या जाणाऱ्या फळबागांमधील पाच प्रमुख फळपिके ः (क्षेत्र हेक्टरमध्ये)
फळपीक —२०२०-२१ —---------२०२२-२३
आंबा—-१५८२२—-----------१९१०२
संत्री—-३६८२—-----------४०३३
काजू—-५०४२—-----------३०५५
मोसंबी—-२७८७—-----------२६६०
नारळ —-११३५—-------------१५३३
अनुदान मिळवण्यासाठी काय करावे लागते?
- जॉब कार्ड आवश्यक, सात-बारावर स्वतःची जमीन आवश्यक, कुळाची जमीन असल्यास कुळाचे संमतीपत्र.
- फळबागेसाठी शेतकरी आपापल्या ग्रामपंचायतीत अर्ज करू शकतात. ग्रामपंचायतीने शिफारस व ठराव मंजूर केल्यास तो कृषी विभागाकडे द्यावा.
- आंबा, डाळिंब, चिकू, पेरू, कागदी लिंबासह बोर, चिंच, आवळा, कवठ, जांभूळ, कोकण, फणस, अंजीर, सुपारीच्या बागांसाठी अनुदान मिळते.
- ३० मार्च २०२२ पासून केळी, ड्रॅगन फ्रूट, अॅव्हॉकॅडो आणि द्राक्षाच्या नव्या बागा उभारण्यास अनुदान दिले जाते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.