
डोंबिवली : परतीच्या पावसाचा मोठा फटका हा डाळिंब (Pomogranate ) फळाच्या उत्पादनाला बसला असून, आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. साधारणतः ऑगस्ट महिन्यात डाळिंबाची आवक वाढण्यास सुरुवात होते. परंतु परतीच्या पावसामुळे डाळिंबाचा हंगाम महिनाभर लांबणीवर गेला असून डाळिंबाचे दर हे वाढले आहेत.
कमी प्रतीचे डाळिंब हे प्रतिकिलो ८० ते ९० रुपये, तर चांगल्या प्रतीचे डाळिंब हे २५० आणि ३०० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत. दुसरीकडे सध्या डाळिंब हे बाजारात कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच तेली रोगामुळे डागाळलेले डाळिंब बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहेत. डाळिंबाच्या झाडावर पडणारा तेली नावाचा रोग डाळिंब फळाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतो.
यंदा हंगामाला उशिराने सुरुवात
सध्या बाजारात राज्यातील सांगोला, सोलापूर, नगर, फलटण, जेजुरी येथून डाळिंब दाखल होत आहेत. यंदा पाऊस लांबल्याने, डाळिंबाच्या बागांना फटका बसला आहे. दरवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यामध्ये २० गाड्यांची आवक होते; परंतु आता केवळ सहा ते आठ गाड्या दाखल होत आहेत. यंदाच्या पावसामुळे डाळिंबाच्या हंगामाला एक महिना उशिरा सुरुवात होत आहे.
महाराष्ट्र अग्रेसर...
डाळिंब फळासाठी भारतात लागवडीखालील क्षेत्र आणि उत्पादन प्रमाण यात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये डाळिंबाच्या लागवडीखालील क्षेत्र आहे. भगव्या जातीच्या डाळिंबाला बाजारपेठेत मागणी आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.