
Ashadhi Vaari : यवत, जि. पुणे ः गेल्या अनेक वर्षांपासून वारकऱ्यांसाठी पिठले-भाकरी बनविण्याची परंपरा यवतकरांनी जपली आहे. सुमारे एक हजार किलोचे पिठले आणि साठ हजार भाकऱ्या व वीस हजार चपात्या दर वर्षी बनवल्या जातात.
यातील साडेतीनशे किलो बाजरीच्या पिठाच्या भाकऱ्या मंदिराच्या भटारखान्यात बनवल्या जातात. याशिवाय घरोघरी बनवून मंदिरात जमा होणाऱ्या भाकऱ्यांची संख्या मोठी असते.
यवत येथे पालखी सोहळ्याचा मुक्काम असतो. हा ग्रामीण भागातील पहिलाच मुक्काम असतो.
या दिवशी वारीतील सुमारे एक लाख वारकऱ्यांना पुरेल इतके जेवण तेही ग्रामीण ढंगाचे बनविण्याची अनेक वर्षांची परंपरा यवतकरांनी जपली आहे.
मंदिराच्या भटारखान्यात गावातीलच कार्यकर्ते पिठले तयार करतात. एका कढईत वीस किलो बेसन व चाळीस किलो इतर साहित्य असे मिळून साठ किलोचे पिठले तयार केले जाते.
चौदा ते पंधरा कढयांमध्ये हे पिठले बनवले जाते. गावातील तरुण मंडळी यासाठी मेहनत घेतात, त्यांना ज्येष्ठ नागरिक मार्गदर्शन करतात.
गुरुवारी (ता.१५) खासदार सुप्रिया सुळे यांनी या ठिकाणी भेट दिली. मंदिराच्या भटारखान्यात सुरू असलेल्या स्वयंपाकात त्यांनी भाकरी भाजण्याचा आनंदही घेतला.
या वेळी माजी आमदार रमेश थोरात, माजी सभापती अप्पासाहेब पवार, माजी उपसभापती नितीन दोरगे, गणेश थोरात, महिला राष्ट्रवादीच्या वंदना मोहिते, सदानंद दोरगे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.