
आटपाडी, जि. सांगली ः माण-खटावाचे जिहे-कटापूर किंवा उरमोडीचे शिल्लक राहणारे ०.७५ टीएमसी पाणी राजेवाडी तलावात (Rajewadi Talav) सोडून माणगंगा नदी बारमाही प्रवाहीत केली जाणार आहे. यासंबंधी नुकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खासदार संजय पाटील, आमदार गोपीचंद पडळकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी भेट घेऊन सकारात्मक चर्चा केली.
लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक होऊन निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आमदार गोपीचंद पडळकर आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण बालटे, मोहनराव रणदिवे, जयवंतराव सरगर, अनिल पाटील, प्रणव गुरव, यल्लाप्पा पवार, हरी गायकवाड आदी उपस्थित होते. राजेवाडी तलाव दुष्काळी भागात येतो. तो दहा वर्षांतून एक-दोन वेळा पावसाच्या पाण्याने भरतो.
तलाव ब्रिटिशकालीन असून तलावाच्या पाणलोट क्षेत्रात छोटी धरणे झाली असल्यामुळे तलाव भरत नाही. तसेच गाळामुळे साठवण क्षमताही कमी झाली आहे. राजेवाडी तलाव जिहे-कटापूर किंवा उरमोडीच्या लाभक्षेत्रात येतो. त्याचे ०.७५ (पाऊण) टीएमसी पाणी शिल्लक राहते. ते पाणी राजेवाडी तलावाला दरवर्षी पावसाळ्यात दिले, तर राजेवाडी तलाव भरू शकतो. तसेच माणगंगा नदीही प्रवाहित होऊ शकते. यासाठी खासदार संजय पाटील यांनी संबंधित विभागाला पाणी सोडण्याचे आदेश देण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
कोरेगावचे आमदार महेश शिंदे आणि माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांनीही या पाण्याची मागणी केली. त्यांना देऊन शिल्लक राहणारे ०.७५ टीएमसी पाणी राजेवाडी तलावात सोडून भरल्यास लिंगीवरे, पुजारवाडी (दि), उंबरगाव, दिघंची हद्दीतील काही भागाला पाण्याचा उपयोग होईल. यासाठी योजनेत या भागाचा समावेश करण्याची गरज आहे. यामुळे माणगंगा बारमाही होईल, असे पडळकर व देशमुख म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.