
Pune News : ‘‘साखर कारखान्यांमधील साखर उत्पादनाशिवाय इथेनॉलसह इतर उपपदार्थांच्या उत्पादनांमधून कारखान्यांना चांगला नफा होत आहे. या वाढीव नफ्यातील ५० टक्के वाटा शेतकऱ्यांच्या हक्काचा आहे. तो शेतकऱ्यांना मिळावा.
यामधील फरक हा एफआरपीपेक्षा अधिक ५०० रुपये प्रतिक्विंटल मिळावा. अन्यथा, आगामी हंगाम सुरू होऊ देणार नाही,’’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शुक्रवारी (ता.१५) पत्रकार परिषदेमध्ये दिला.
शेट्टी म्हणाले, ‘‘यंदाच्या साखर हंगामावर दुष्काळाचे सावट आहे. सध्या देशात २५ ते ३० लाख टन साखरेचा साठा शिल्लक आहे. हा साठा कमी असून, साखरेचे दर देखील ३ हजार ३०० रुपयांवरून ३ हजार ८५० रुपये झाला आहे. यामुळे साखर कारखान्यांना कोणताही तोटा नाही.
तसेच अनेक कारखाने एक टक्क्यांपेक्षा अधिक अडीच ते तीन टक्के गाळप हे इथेनॉलसाठी करीत आहेत. इथेनॉलचा उत्पादन खर्च आणि विक्री दरातील १ टक्का इथेनॉलच्या गाळपातील १६४ रुपये हे शेतकऱ्यांच्या हक्काचे आहेत. असे सुमारे २५० ते ३०० रुपये होतात.
यामुळे गेल्या हंगामातील ऊस दरात ‘एफआरपी’पेक्षा ५०० रुपये अतिरिक्त मिळावेत. मागणीची दखल सरकारने घेतली नाही, तर २ ऑक्टोबरनंतर आंदोलनाचे विविध टप्पे आम्ही सुरू करणार आहोत. एकरकमी ‘एफआरपी’साठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे चार बैठका घेतल्या. मात्र अद्याप कोणतीही कार्यवाही सरकारने केलेली नाही. ’’
‘राज्यातील खरिपाची राखरांगोळी’
‘‘राज्यात खरिपाची राखरांगोळी झाली असताना ेदेखील सरकार अद्याप दुष्काळ जाहीर करत नाही. अनेक गावांमध्ये महिनाभरात एक थेंब देखील पाऊस झालेला नाही. ऐन फुलोऱ्यातील खरीप जळाला आहे. आता फक्त झाडेच शिल्लक आहेत. सरकार विमा देईल या आशेवर शेतकरी आहेत. मात्र सरकारचे याकडे लक्ष नाही. सरकारने ‘एनडीआरएफ’च्या निकषात बदल करण्याची गरज आहे. यासाठी लवकरच केंद्र सरकारमधील मंत्र्यांना भेटणार आहे,’’ असे शेट्टी म्हणाले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.