
Khandesh News : जळगाव ः खानदेशात पपई पिकाची लागवड यंदा वाढली असून, पीक सध्या जोमात आहे. पावसाने शेतात पाणी साचून नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी पिकात प्रतिबंधात्मक उपाययोजना करीत आहेत. नंदुरबार जिल्ह्यात सुमारे सात हजार हेक्टरवर सर्वाधिक पपई पीक आहे.
खानदेशात नंदुरबारात सुमारे सात हजार हेक्टरवर पपई पीक आहे. एकट्या शहादा तालुक्यात सुमारे ५००० हेक्टरवर पपई आहे. या पाठोपाठ धुळ्यात सुमारे अडीच हजार हेक्टरवर आणि जळगाव जिल्ह्यात सुमारे तीन हजार हेक्टरवर पपई पीक आहे.
जळगावमध्ये चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, जामनेर, पाचोरा भागांत पपई आहे. धुळ्यात शिरपूर, शिंदखेडा व धुळे तालुक्यांत पपईची लागवड झाली आहे. पपईचे पीक कमी पावसात जोमात होते. तापी, अनेर नदीकाठच्या काळ्या कसदार जमिनीत अतिपावसानंतर किंवा पाण्याचा निचरा व्यवस्थित न होणाऱ्या क्षेत्रात पिकाचे काहीसे नुकसान झाले. दोन ते पाच टक्के नुकसान यात झाले. झाडे पिवळी, काळी पडून १०० टक्के नुकसान या समस्येने झाले आहे. या स्थितीत शेतकरी पिकात बुरशीनाशके देण्यासह पावसाचे पाणी वाहून नेणारे मार्ग व्यवस्थित करून घेत आहेत. पिकाला फुलधारणा सुरू आहे. सप्टेंबरअखेर किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीला दर्जेदार फळांची काढणी खानदेशात सुरू होईल. अनेक शेतकऱ्यांनी लागवड गादीवाफा पद्धतीने केली आहे.
पॉलीमल्चिंगचा वापरही झाला आहे. या क्षेत्रात तणनियंत्रणाची फारशी आवश्यकता नसल्याची स्थिती आहे. परंतु पिकात लव्हाळा व इतर तणे येत असल्याने शेतकरी सध्या नाइलाजाने तणनाशकांचा उपयोग करीत आहेत. पपईचे दर गेल्या हंगामात कमी अधिक झाले. पण नैसर्गिक समस्या असतानादेखील बऱ्यापैकी नफा शेतकऱ्यांना मिळाला. अतिपावसात पिकाची हानी होते, असा गेले दोन वर्षे अनुभव शेतकऱ्यांना आहे. यंदा अति पाऊस येऊ नये, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.