
Pune News : भाताचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात भातलागवडींना वेग आला असून, दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे, भातखाचरांमध्ये पाणी साचल्याने भातलावणीची लगबग शेतशिवारात सुरू झाली आहे.
खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात वाडा, तिफनवाडी, वाळद, आव्हाट, खरोशी, धुवोली, मंदोशी, टोकावडे, भोरगिरी यांसह सर्वच भागांत खरीप हंगामात जवळपास सर्वच ठिकाणी भातलागवड केली जाते. सरासरी २००० ते २२०० मिमी सरासरी पाऊस पडणाऱ्या तालुक्याच्या या पश्चिम पट्ट्यात ३२०० ते ३३०० हेक्टर क्षेत्रावर भाताच्या लागवडी होत असतात.
चालू वर्षी सुरुवातीच्या टप्प्यात वरुणराजाने हजेरी लावली नव्हती त्यामुळे शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर भातरोपे तयार केली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून दमदार पावसाने आगमन केल्याने भातखाचरात मुबलक प्रमाणात पाणी साचले असून भाताच्या लागवडी करणे सोपे झाले आहे.
सद्यःस्थितीत खेड तालुक्याच्या सर्वच भागांत भातलागवडींना वेग आला असून लागवडीसाठी भातखाचरांमध्ये चिखलणीसाठी बैलांऐवजी ट्रॅक्टरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो आहे.
भाताच्या लागवडीसाठी कृषी विभागाच्या सल्ल्याने या भागात भाताचे पीक प्रात्यक्षिक प्लॅाट घेण्यात आलेले असून, पारंपरिक लागवडीबरोबरच चारसूत्री भाताची लागवड करण्यासाठी शेतकरी पुढाकार घेत असल्याने गेल्या काही वर्षांत भाताचे उत्पन्न वाढले आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.