
Wada News : पालसई गावातील टायर कंपन्यांतील रासायनिक सांडपाणी शेतीत जात असल्याने भात पिकाचे नुकसान होत आहे. येथील सुमारे दहा एकर शेतात रासायनिक सांडपाण्याचे तवंग असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. या कंपन्या बंद करण्यात याव्यात, अशी मागणी स्थानिकांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
वाडा तालुक्यात औद्योगिकीकरण झाल्याने अनेक कंपन्या येथे स्थिरावल्या आहेत. तालुक्यातील पालसई गावाच्या परिसरात अनेक टायरच्या कंपन्या आहेत. जुन्या वाहनांचे टायर तोडून त्यातून राख, ऑईल व तार काढून त्याचा उपयोग अन्य कामासांठी केला जातो. हे सर्व करत असताना या कंपन्यांतून प्रदूषण होते.
कंपन्यांतील रासायनिक सांडपाणी भातशेतीत जात असल्याने नव्याने केलेली लावणी करपून जात आहे, तर शेतात रासायनिक सांडपाणी गेल्याने त्याचे तवंग दिसून येत आहेत. या कंपन्यांच्या जलप्रदूषणामुळे अनेक शेतकऱ्यांच्या भातशेतीचे नुकसान होत आहे. या शेतकऱ्यांनी अलीकडेच तक्रार दाखल करून या कंपन्या बंद करून भरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
कूपनलिकेचे पाणीही प्रदूषित
भातशेतीबरोबरच येथील कूपनलिकेचे पाणीही प्रदूषित झाल्याचा दावा या शेतकऱ्यांनी तक्रारीत केला आहे. ग्रामपंचायतीनेही ३१ मे २३ रोजी झालेल्या ग्रामसभेत, प्रदूषण करणाऱ्या काही कंपन्या बंद करण्याचा ठराव घेण्यात आला होता.
अनेक शेतकऱ्यांचे नुकसान
रवींद्र पांडुरंग पाटील
अमृत तुकाराम पाटील
मोहन गोविंद पाटील
सुधाकर शंकर पाटील
पुंडलिक विठ्ठल पाटील
प्रभाकर विनायक पाटील
गोविंद रामचंद्र पाटील
सुरेश रामचंद्र पाटील
प्रभाकर पद्मण पाटील
प्रभाकर विनायक पाटील
आदी शेतकऱ्यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.