
Kolhapur Lumpy News : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात लम्पी रोगाचा उद्रेक झाला असून गावागावांत आठ- दहा जनावरे लम्पीग्रस्त झाल्याची चित्र आहे. करवीर एका तालुक्यात लम्पीमुळे आतापर्यंत चार महिन्यांत ६५ जनावरे दगावली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत तातडीने पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
याबाबत माहिती घेतली असता तालुका पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी अगदी नगण्य नोंदी केल्याने अनेक पशुपालकांना फटका बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात अद्याप दहा हजार जनावरांचे लसीकरण झालेले नाही. दरम्यान, देशी गोवंश मोठ्या प्रमाणावर बळी पडत असून यासाठी राज्य शासनाने विशेष मोहीम घ्यावी, अशी मागणी होत आहे.
जिल्ह्यात जानेवारी महिन्यात लम्पीचा प्रादुर्भाव सुरू झाला. पण करवीर तालुक्यात याची लागण कमी प्रमाणात होती. फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या तीन महिन्यात गायवर्गीय जनावरांच्यात मोठ्या प्रमाणावर लम्पीचा प्रसार सुरु झाला. यामुळे कोपार्डे येथील जनावरांचा बाजार बंद करण्यात आला होता.
दरम्यान याबाबत करवीर तालुक्याचे पशुसंवर्धन अधिकारी युवराज शेटे म्हणाले की, लम्पीची लागण झाल्यास शेतकऱ्यांनी शासकीय दवाखान्यात जनावरांची नोंद करून उपचार सुरू करावेत. गोठ्याची स्वच्छता ठेवावी.
ग्रामपंचायतमार्फत डास निर्मूलन करून घ्यावे. जनावरांना जास्तीत जास्त हिरवा चारा द्यावा, भरडा द्यावा. तालुक्यातील १८ दवाखान्यांत औषधे उपलब्ध असून डेल्टा, सायपरमेथरीन औषध गोठ्यात फवारावे असे ते म्हणाले.
करवीर तालुक्यातील पश्चिम भागात लम्पीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे. वाकरे, हळदी, कांडगाव सांगरुळ, सडोली, शिरोली, म्हारुळ, खाटांगळे, खुपीरे, कुडित्रे यासह अनेक गावांत लम्पीमुळे जनावरे दगावली आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.