पुणेः राज्यात गुरुवारपासून पावसाचा जोर (Rain Intensity) वाढला. शुक्रवारीही राज्यातील बहुतांश भागांत पाऊस (Rainfall) झाला. तर काही ठिकाणी अतिवृष्टीची (Heavy Rain) नोंद झाली. तर हवामान विभागाने उद्या सकाळपर्यंत काही भगांत ऑरेंज अलर्ट (Rain Orange Alert) जारी केला. तर राज्यभरात जोरदार पावासाचा येलो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला.
मराठवाड्यात ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये झाला. कुंटूर मंडलात अतिवृष्टी झाली. जोरदार पावसामुळे नद्यांना पूर आले. त्यामुळे सखल भागातील पिके पाण्याखाली गेली आहेत. सततच्या पावसामुळे जमिनी चिबडून पिकांच नुकसान होतंय. परभणी जिल्ह्यातील ५२ मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला. तर हिंगोली जिल्ह्यातील ३० मंडलांत मध्यम ते जोरदार पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या या पवसानं पिकांचं नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं.
पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा जोर धरलाय. त्यामुळे वाढीच्या अवस्थेत असलेल्या पिकांना दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्याने धरणांत पाण्याची आवक कमी झाली होती. भात पट्ट्यातही लागवडीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वदूर पावसाचे पुनरागमन झालंय. जिल्ह्यात देवळा तालुक्यांत सर्वाधिक ५३.३ मिमी पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील देवळा व लोहणेर मंडळात ७३ मिमी अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
कोकणात अनेक भागांत पावसाचा जोर वाढला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागांत गुरुवारी रात्री जोरदार पाऊस झाला. आंबोली परिसरात ढगफुटीसदृश पावसाने हजेरी लावली. त्यामुळे धबधब्यांकडे जाणारी सर्व वाहतूक थांबविण्यात आली. तर बांदा परिसरात पुराचे पाणी जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शुक्रवारी सकाळपासून जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी पडत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातही काही भागांत जोरदार सरी झाल्या. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील वायफळे आणि जत तालुक्यातील डफळापूर येथे जोरदार पावसाने हजेरी लावली. डफळापूर येथील ओढ्याला पाणी आले तर, वायफळे येथील सिध्देवाडी तलाव ओसंडून वाहू लागला आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून हलका पाऊस तर काही ठिकाणी रात्रीच्या वेळी तासभर मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते.
विदर्भातही अनेक भागांत जोरदार सरी झाल्या. अकोला जिल्ह्यात गेले आठवडाभर विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा परतलाय. वाशीम जिल्ह्यात दुपारनंतर रात्री उशिरापर्यंत जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने पिकांना जोरदार तडाखा बसण्याची शक्यता आहे. अनेक मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. मालेगाव तालुक्यामध्ये ७१.८, मंगरूळपीर तालुक्यात २४ तासांत सरासरी ७०.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. बुलडाणा जिल्ह्यातही काही भागांत जोरदार पाऊस झाला.
हवामान विभागाने उद्या सकाळपर्यंत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिलाय. तर उर्वरित राज्यात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.