
Mohol News : पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला; मात्र मोहोळ तालुक्यात एकही दमदार पाऊस झाला नाही. शेतकऱ्यांनी पाऊस पडेल या आशेवर केवळ २० टक्के पेरणी केली आहे. पाऊस वेळेत न पडल्याने खरीप हंगाम वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. दरम्यान, जी पेरणी झाली आहे त्यात सोयाबीनची पेरणी जादा झाली आहे. मोहोळ तालुक्याला मोठ्या पावसाची गरज आहे.
पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले. २५ मे रोजी रोहिणी नक्षत्र सुरू झाले. त्यानंतर मृग, आर्द्रा आदी नक्षत्रे सुरू झाली. मात्र एकाही नक्षत्रात दमदार पाऊस झाला नाही. पाऊस नसल्याने व कडक उन्हामुळे विहिरी, बोअरच्या पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळे ऊस, मका या पिकांसह द्राक्ष, डाळिंब, पेरू, सीताफळ, बोर या फळबागा धोक्यात आल्या आहेत.
शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. मात्र चारा नसल्याने व आहे तो महाग झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक अडचण झाली आहे. मात्र दुधाचा दर व जनावराला लागणारे विविध खाद्य यांचा ताळमेळ घातला तर दुग्ध व्यवसायही तोट्यातच आहे. उत्तम प्रकारे सांभाळलेल्या उसाचा चाऱ्यासाठी वापर होत असल्याने साखर कारखानेही अडचणीत आले आहेत.
बैलांची संख्या कमी झाल्याने शेतीच्या मशागतीची सर्व भिस्त आता लहान ट्रॅक्टरवर आहे. आहे ती पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू असताना, आष्टी तलाव परिसरातील महावितरणने ५५ ट्रान्सफॉर्मरचा विद्युतपुरवठा खंडित केला आहे.
पिण्यासाठी पाणी राखीव ठेवल्याने केवळ दोन तासच विद्युतपुरवठा सुरू ठेवला जात आहे. त्यामुळे साडेतीन हजार एकर क्षेत्रावरील पिके व फळबागा धोक्यात आल्या आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.