
Nashik News : मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आर्द्रा नक्षत्रात पावसाने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा दिला. जिल्हाभरात पावसाने लावलेल्या हजेरीमुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली. मात्र, आठवड्यात पावसाने पुन्हा ओढ दिली आहे.
जिल्ह्याच्या काही भागांत पावसाचा जोर असला तरी, काही तालुक्यांमध्ये पावसाचा जोर नसल्याने पुरेशी ओल नसल्याकारणाने खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. जुलैचा पहिला आठवडा उलटलेला असला तरी, जिल्ह्यात शुक्रवारअखेर (ता. ७) अवघ्या ८.३१ टक्के पेरण्या झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
जिल्ह्यात खरीप हंगामासाठी ६ लाख ४३ हजार ३२५ हेक्टर क्षेत्र निश्चित केले असून यापैकी आतापर्यंत ५३ हजार ३२९ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. मागील वर्षी जुलैच्या पहिल्या सप्ताहात १ लाख ३७ हजार ९८३ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. त्यानुसार २१ टक्के पेरण्या झाल्या होत्या. यंदा १३ टक्के पेरण्या कमी आहेत.
जिल्ह्यात येवला तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे. यंदाही शेतकऱ्यांनी मका आणि सोयाबीन या पिकांना पसंती दिली आहे. आतापर्यंत २३ हजार ४७२ हेक्टरवर मक्याची लागवड झाली आहे. ७ हजार ९६३ हेक्टर क्षेत्रावर सोसाबीन लागवड झाली आहे. ४ हजार ८३६ हेक्टर क्षेत्रावर बाजरीचा पेरा झाला. कमी पावसाच्या भागात शेतकऱ्यांनी बाजरीला पसंती दिली.
यंदा कमी पावसाचा अंदाज असल्याने काही शेतकऱ्यांनी मकाऐवजी बाजरीला पसंती दिली आहे. जून उलटला असला तरी जिल्ह्याच्या काही भागांत अद्याप पेरणीयोग्य पाऊस नसल्याने शेतकरी पावसाचा अंदाज घेऊनच पेरणीचा निर्णय घेत आहेत. ज्या भागात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे आणि जमिनीत पुरेशी ओल तयार झाली आहे, अशा भागात पेरण्यांना सुरुवात झाली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.