
Satara News : गतवर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले होते. यापोटी शासनाने पुणे विभागातील पाच जिल्ह्यांतील एक लाख ९४ हजार ५५० शेतकऱ्यांच्या एक लाख एक हजार ३०७ हेक्टर क्षेत्रावरील पिकांच्या नुकसान मदतीपोटी २१६ कोटी ४६ लाख एक हजार रुपये निधी मार्चमध्ये मंजूर केला होता. मात्र तीन महिने उलटले तरी अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळाली नसल्याची स्थिती आहे.
गतवर्षातील सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, तसेच नाशिक विभागातील नाशिक, धुळे, नंदूरबार,जळगाव, नगर जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली.
यामध्ये खरीप पिकांसह नगदी पिके व फळबागांचे मोठे नुकसान झाले होते. पिके जमीन दोस्त झाल्यामुळे शेतकरी पुरते हवालदिल झाले. नुकसानीचे पंचनामे करून अहवाल शासन दरबारी पाठविले गेले.
दरम्यान, दैनिक ‘ॲग्रोवन’ने ‘सातारा जिल्ह्यातील ३३ हजार शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत’ याविषयी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर शासनाने तब्बल पाच ते सहा महिन्यांनी पुणे विभागातील मदतीपोटी २१६ कोटी ४६ लाख रुपये निधी मंजूर केला.
यामध्ये सातारा जिल्ह्यातील २४ हजार ७५४ शेतकऱ्यांना १७ कोटी चार लाख रुपयांच्या निधी समावेश आहे. मात्र अजून मदत मिळालेली नाही. लवकर मदत द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार
पावसाने दडी मारल्याने खरिप हंगामाचे काय होणार, अशी शेतकऱ्यांना चिंता आहे. त्यात सरकार नुसता निधी मंजूर करून ठेवते. तो प्रत्यक्षात दिला जात नसल्याने तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार सुरू असल्याचा शेतकऱ्यांकडून आरोप केला जात आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.