
सोलापूर ः शेतकऱ्यांना शेतीपंपासाठी वीजजोडणी देण्यासाठी महावितरणने पुढाकार घेतला असून, आकडेमुक्त गाव मोहीम राबविण्यासाठी महावितरणचे मुख्य अभियंता सुनील पावडे व वरिष्ठ अभियंते गावपातळीवर मेळावे घेऊन शेतीचे अर्ज स्वीकारत आहेत. गेल्या काही दिवसांत मोहोळ, करमाळा व सांगोला येथील मेळाव्यात ७७३ शेतकऱ्यांनी शेती जोडणीकरिता अर्ज केले. २५१ शेतकऱ्यांना ‘ऑन द स्पॉट’ कोटेशन देण्यात आले.
शेतीपंपाला अखंडित व पुरेशा दाबाने वीजपुरवठा होण्यासाठी रोहित्रावर असलेला अनधिकृत भार कमी होणे आवश्यक आहे; मात्र आकडेबहाद्दरांवर कारवाई करूनही आकडे टाकले जात असल्याचे निदर्शनास आल्याने आकडेबहाद्दरांना नवीन वीजजोडणी घेण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. बुधवारी (ता. २८) बिटले (ता. मोहोळ) येथील वीज कर्मचाऱ्यांनी वीज उपकेंद्राच्या वधार्पनदिनाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील पावडे, अधीक्षक अभियंता संतोष सांगळे, कार्यकारी अभियंता रमेश राठोड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्रीकृष्ण वायदंडे तसेच माजी पंचायत समिती सदस्य अजिंक्यराणा पाटील उपस्थित होते. या वेळी शेतकऱ्यांशी बोलताना मुख्य अभियंता पावडे यांनी आकडेमुक्तीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. शेतकऱ्यांनी आकडे काढून नवीन कनेक्शन घेतल्यास महावितरणकडून चांगल्या सेवेची हमी दिली. तेव्हा अजिंक्यराणा पाटील यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमात २१३ शेतकऱ्यांचे अर्ज आले. त्यातील १५० कोटेशन तत्काळ देण्यात आली. त्यानंतर गुरुवारी (ता. २९) सकाळी मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी करमाळा उपविभागात मेळावा घेतला. या ठिकाणी १५९ अर्ज प्राप्त झाले. त्यातील १०१ कोटेशन तातडीने दिली. तर दुपारी सांगोला येथे मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात तब्बल ४०१ शेतकऱ्यांनी अर्ज आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.