
अकोला ः शेतीला दिवसा पुरेशी वीज मिळत नसल्याने अनेक शेतकरी सौर कृषिपंप (Solar Pump) बसवण्यासाठी पुढे येत आहेत. मात्र हे सौरपंप बसवणाऱ्या कंपन्यांकडून नंतरच्या काळात सेवा देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने अनेक शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून शेतकऱ्यांना टोलवून लावण्याचे प्रकार सर्रास घडू लागले आहेत. मेहकर (जि. बुलडाणा) तालुक्यातील बेलगाव येथील शेतकरी गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा करीत असताना कुठल्याही पातळीवर त्याला न्याय मिळू शकलेला नसल्याची माहिती समोर आली आहे.
या बाबत अधिक माहिती अशी, बेलगाव येथील भागवतराव आश्रुजी वानखेडे यांनी मुख्यमंत्री सौरऊर्जा योजनेअंतर्गत ८ जुलै २०२१ ला अर्ज केला होता. त्यांना साडेसात अश्वशक्तीचा पंप नंतर मंजूर करण्यात आला. त्यानुसार त्यांनी मेहकर येथे महावितरण कार्यालयात ६ ऑगस्ट २०२१ ला पैशांचा भरणा केला.
ऑनलाइन निवडीमध्ये त्यांनी टाटा पॉवर सोलर कंपनीचा पंप निवडला. कंपनीकडून त्यांच्या शेतात पंप लावण्याचे काम संबंधितांनी केले. मात्र हा पंप पूर्णपणे अद्यापही बसून दिल्या गेलेला नाही. त्यामुळे वर्षभरापूर्वी लावलेल्या पंपाचा या शेतकऱ्याला काहीही फायदा झालेला नाही. शेतकऱ्याने कंपनीच्या टोलफ्री क्रमांकावर अनेकदा संपर्क साधला तर उडवाउडवीची उत्तरे दिल्या गेली. कंपनीकडून ओसवाल कंपनीचा मोटरपंप व स्टार्टर देण्यात आले आहे. तर अदानी कंपनीचे सौर पॅनेल लावण्यात आले. पंप व्यवस्थित न लावल्याने त्याचा शेतीसाठी उपयोग होत झालेला नाही.
परिणामी, शेतकऱ्याने आतापर्यंत जिल्हाधिकारी तसेच महावितरण कंपनीकडे पाच ते सहा वेळा तक्रार केली आहे. याअनुषंगाने प्रशासनाकडून वरचेवर पत्र काढून सेवा देण्याबाबत आदेश दिल्या गेले. मात्र संबंधितांकडून अद्यापही शेतकऱ्यांचे समाधान केल्या गेले नाही. सौरपंपाचा कुठलाही फायदा या शेतकऱ्याला होत नसल्याचे त्यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.