चाळीसगाव, जि. जळगाव : तालुक्यात मंजूर पाणंद रस्ते, विहिरी व गोठाशेडपासून अद्यापही शेतकरी (Farmer) वंचित असल्याने राष्ट्रवादी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. या वेळी २३ दिवसांच्या आत या समस्या मार्गी लावाव्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांना निवेदनाद्वारे देण्यात आले.
तालुक्यात पाणंद रस्ते, विहिरी व गोठाशेडला मंजुरी व प्रशासकीय मान्यता मिळून अनेक दिवस उलटले. तरीही शेतकरी प्रत्यक्षात लाभापासून वंचित आहेत. यामुळे समस्यांचे तत्काळ निराकरण व्हावे, यासाठी राष्ट्रवादीतर्फे सोमवारी पंचायत समितीच्या आवारात ठिय्या आंदोलन करून गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, की मागील पाच वर्षांपासून मंजूर झालेल्या पाणंद रस्ते, विहिरी व गोठाशेडला घेऊन पंचायत समितीची उदासिनता दिसून येत आहे. शेतकरी वारंवार प्रकरणाच्या कागदाची पूर्तता केलेली फाईल घेऊन पंचायत समितीच्या चकरा मारतो. त्याचबरोबर या वर्षी मोठ्या प्रमाणात पाणंद रस्ते मंजूर झाले आहेत.
मात्र ऑगस्ट महिना उलटूनही कार्यारंभ आदेश मिळालेला नाही. म्हणून प्रलंबित असलेल्या विहिरी व गोठाशेड याची पंचायत समिती स्तरावर तातडीने कार्यवाही व्हावी, अशी मागणी केली आहे.
मात्र या महिन्याच्या अखेरीस, अर्थात ३० नोव्हेंबरच्या आत मंजूर झालेल्या पाणंद रस्त्यांसह विहिरी व गोठाशेडच्या कामाला प्रारंभ न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा तालुकाध्यक्ष दिनेश पाटील यांनी दिला. निवेदनावर जिल्हा परिषद गटनेते शशी साळुंखे, तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, माजी सभापती अजय पाटील, अनिल निकम, ईश्वर ठाकरे, मोहित भोसले, आदींच्या सह्या आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.