
नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजने (Pradhan Mantri Krishi Sinchai Yojana) अंतर्गत प्रति थेंब अधिक उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना पुरविण्यात आलेल्या तुषार, ठिबक सिंचन संचाचे दोन वर्षांतील सहा कोटी ७५ लाख रुपयांचे अनुदान थकले आहे.
मागील वर्षी या योजनेत ८ हजार शेतकऱ्यांना २१ कोटी ४१ लाखांचे अनुदान वितरित करण्यात आले होते.
शेतकऱ्यांनी पाण्याचा संरक्षित वापर करून पंतप्रधान कृषी सिंचन योजने अंतर्गत प्रति थेंब अधिक उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना ८० टक्के अनुदानावर ठिबक, तुषार संच पुरविण्यात येतात.
‘महाडीबीटी’च्या माध्यमातून शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड केली जाते. यानंतर खरेदी प्रक्रिया झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वितरित करण्यात येते. हे अनुदान केंद्र तसेच राज्य शासन वितरित करते.
या योजनेत २०२१ मध्ये ८ हजार ९ शेतकऱ्यांना २१ कोटी ४१ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले.
परंतु मागील सहा महिन्यांपासून या योजनेच्या अनुदानाला ब्रेक लागला आहे. २०२१-२२ या वर्षातील १३३१ शेतकऱ्यांनी ठिबक, तुषार संच खरेदी करून अनुदानाची मागणी केली. परंतु त्यांचे तीन कोटी ५५ लाख रुपयांचे अनुदान थकले आहे.
तर २०२२-२३ या आर्थिक वर्षातील ११८९ शेतकऱ्यांचे तीन कोटी २० लाखांचे अनुदान रखडले आहे. दोन वर्षांतील एकूण सहा कोटी ७५ लाख रुपयांचे अनुदान थकले आहे.
शेतकऱ्यांच्या ‘कृषी’कडे चकरा
अनुदानासाठी शेतकरी कृषी कार्यालयाकडे चकरा मारत आहेत. परंतु शासनाकडूनच अनुदान मिळाले नसल्याने ते रखडल्याची माहिती अधिकारी देत आहेत. मागील वर्षातील अनुदान काही दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.