
Jalgaon News : खानदेशात सातपुडा पर्वतागलतचे अनेक सिंचन प्रकल्प भरले आहेत. परंतु पश्चिम भागात मात्र जोरदार पावसाअभावी अनेक प्रकल्पांतील साठा कमी आहे. खानदेशातील प्रकल्पांत सध्या एकूण १८ टक्के जलसाठा आहे. त्यात जळगाव जिल्ह्यातील पश्चिम भागातील सर्वात मोठा गिरणा नदीवरील गिरणा प्रकल्प रिकामाच आहे. त्यातील जलसाठा १९ टक्क्यांखाली आहे.
तसेच पाचोऱ्यातील अग्नावती, बहुळा, चाळीसगावमधील मन्याड, पारोळ्यातील बोरी, भोकरबारी, जामनेरातील तोंडापूर आदी प्रकल्प कोरडेच आहेत किंवा अल्प साठा त्यात वाढला आहे. जामनेरातील वाघूर प्रकल्पातील साठाही घटतच आहे.
कुठलाही वाढ त्यात मागील तीन ते चार दिवसांत नोंदविण्यात आलेली नाही. धुळ्यातील पांझरा, मालनगाव, सोनवद, साक्रीमधील बुराई, अमरावती, शिरपुरातील अनेर हे प्रकल्पदेखील भरलेले नाहीत. नंदुरबारमधील सुसरी, दरा प्रकल्पातही जलसाठा हवा तेवढा वाढलेला नाही.
जळगाव जिल्ह्यात सातपुडा पर्वातालगत रावेरातील मंगरूळ, अभोरा व सुकी हे मध्यम प्रकल्प भरले आहेत. तसेच अलीकडेच चोपड्यातील गूळ प्रकल्पात गेल्या वर्षाचा पाणीसाठा असल्याने १३ जुलैला सकाळी सातला प्रकल्पाचे दोन गेट ०.१० मीटरने उघडण्यात आले होते. त्यातून जवळपास ०.४६ दशलक्ष घनमीटर पाण्याचा विसर्ग झाला. आता ते कमी करून ०.५ मीटरने करण्यात आले. मालापूर (ता. चोपड) येथे सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये गूळ नदीवर गूळ प्रकल्पाची निर्मिती केली आहे.
या प्रकल्पात पाण्याचा साठा २३ दशलक्ष घनमीटर एवढा असून, २६८.४८ मीटर एवढा पूर्ण क्षमतेचा साठा असतो. १३ जुलैला या प्रकल्पात १३.१४ दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा होता. त्यातून ०.४६ दशलक्ष घनमीटरचा विसर्ग करण्यात आला. सध्याची धरणातील पाण्याची पातळी २६४.७६ मीटर असून, सध्या ५३ टक्के पाणीसाठा आहे. १ जूनपासून ते १३ जुलैपर्यंत या प्रकल्पाच्या परिसरात २१० मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
गेल्या वर्षी १ जून २०२२ ते १३ जुलै २०२२ पर्यंत २०७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. या प्रकल्पातील ३० टक्के पाणीसाठा चोपडा शहराला पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवलेला असतो. परंतु यावल तालुक्यातील मोर प्रकल्पात हवा तेवढा जलसाठा वाढलेला नाही. कमी किंवा मध्यम पाऊस प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात झाला आहे. जोरदार पावसाची गरज प्रकल्प भरण्यासाठी आहे.
हतनूरमधून विसर्ग सुरूच
तापी नदीवरील भुसावळनजीकच्या (जि.जळगाव) हतनूर प्रकल्पातून मागील १५ दिवसांपासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यातून विसर्ग आवकेनुसार कमी अधिक होत आहे. मध्यंतरी त्याचे १६ दरवाजे पूर्णतः उघडले होते. परंतु आता त्यातून विसर्ग कमी करण्यात आला आहे. तसेच तापी नदीवरील धुळ्यातील सुलवाडे बॅरेज, नंदुरबारमधील सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजमधूनदेखील पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.