
Jalgaon News : जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमध्ये गणल्या जाणाऱ्या गिरणा नदीतून गेले २८ वर्षे सतत वाळूउपसा सुरू आहे. या उपशावर प्रशासन व इतर यंत्रणा नियंत्रण आणू शकलेल्या नाहीत. नदीत वाळूच शिल्लक नसल्याची स्थिती अनेक भागांत तयार झाली आहे. यामुळे नदीकाठच्या शिवारातील विहिरी, कूपनलिकांचे पाणी कमी असून, जलपातळी खालावली आहे.
नदी, कूपनलिकांचे पुनर्भरण व्हावे, गावांमधील टंचाई दूर व्हावी यासाठी नदीत दर महिन्यात पाणी सोडावे लागते. दर दीड ते दोन महिन्यांत नदीत पाणी सोडले जाते. हे पाणी नदीच्या अखेरच्या टोकापर्यंत पोहोचत नाही. नदीत पाणी अधूनमधून सोडले जाते. गेले तीन वर्षे चांगला पाऊस झाला.
तरीदेखील नदीकाठी अनेक विहिरी, कूपनलिकांचे पाणी फारसे वाढलेले नाही. शेतकऱ्यांना नव्याने कूपनलिका कराव्या लागतात. तसेच विहीर खोलीकरणही करावे लागत आहे. उन्हाळ्यात कूपनलिका आटू लागतात. यामुळे केळी, लिंबू, भाजीपाला, बाजरी, भुईमूग आदी पिके वाचविताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येतात. धरणगाव, एरंडोल, भडगाव, पाचोरा, चाळीसगाव, जळगाव या भागांतून गिरणा नदी जाते.
गिरणा नदीत वाळूचा प्रचंड साठा होता. परंतु या वाळूचा उपसा गेले अनेक वर्षे केला जात आहे. गिरणा नदीचा लाभ १०० पेक्षा अधिक गावांना होते. नदीकाठच्या गावांमधून वाळूची चोरी, वाळूउपसा रात्रंदिवस सुरू असतो.
प्रशासनही काही वेळेस कारवाईचा देखावा करते. नदीत वाळू नसल्याने पाणी मुरण्याच किंवा त्याचे पुनर्भरण होण्यास अडथळे येतात. पाणी वाहून जाते. जेव्हा वाळू नदीत मुबलक प्रमाणात होती, त्या वेळेस दोन वर्षे दुष्काळी स्थिती राहूनही नदीकाठी टंचाई तयार होत नसे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.