नगर : जिल्ह्यात सुमारे साडेसहाशेहून अधिक शाळांतील पोषण आहार (Poshan aahar) संपला असल्याने त्या शाळेतील खिचडी (Khichadi) बंद झाली आहे. या पोषण आहाराशिवाय किमान एक महिना काढावा लागणार आहे.
मात्र तोपर्यंत शाळेला सुट्टी लागेल. त्यामुळे आता थेट जूनमध्ये खिचडी मिळण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारच्या शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या अनुदानित शाळांना पोषण आहार दिला जातो. वाटप केले जाते. त्यात जिल्हा परिषद, खासगी अनुदानित तसेच महापालिका अशा एकूण ४ हजार ५४८ शाळा आहेत.
या शाळांमध्ये पहिली ते पाचवीत २ लाख ८५ हजार ३१, सहावी ते आठवीत १ लाख ८७ हजार ८६३ विद्यार्थी आहेत, अशा ४ लाख ७२ हजार ८९४ विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळतो. शिक्षण संचालक कार्यालयाकडून वाटप मंजूर होऊन दर महिन्याचा तांदूळ १५ दिवस अगोदरच शासन जिल्ह्याच्या शासकीय गोदामात पोहोच करते.
डिसेंबर, जानेवारी महिन्यांचा तांदूळ जिल्ह्याला प्राप्त झाला होता. त्यानंतर फेब्रुवारी व मार्चही अर्धा संपला, मात्र शाळांचा तांदूळ अद्यापि आला नाही.
शिक्षण संचालक जिल्ह्याला तांदूळ पाठवतात. पुढे शाळेत पाठवण्याची जबाबदारी ठेकेदाराकडे असते. आता शासनाने पुढील वर्षासाठी नवीन ठेकेदार नेमल्याचे म्हटले आहे. परंतु नगर जिल्ह्यात पूर्वीच्याच ठेकेदाराला मुदतवाढ दिली आहे.
नगर तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकारी तांदळाची नोंदणी ठेकेदाराकडे करतात. ही मागणी आल्यानंतर ठेकेदार एकत्रित ती शिक्षण संचालक कार्यालयाकडे देतो. यानंतर शासनाकडून तांदूळ जिल्ह्याच्या शासकीय गोदामात येतो.
तेथून प्रत्येक शाळेत तांदूळ पोहोच करण्याची जबाबदारी ठेकेदाराची आहे. या प्रक्रियेला २० दिवसांचा कालावधी लागतो.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.