
Pune News : राज्यात खरीप पेरण्यांना वेग आला आहे. शेतकरी आजपासून (ता.१) ई-पीक पाहणीची नोंदणी करू शकतील. विशेष म्हणजे भ्रमणध्वनीवर आता ई-पीकपाहणीच्या नोंदणीसाठी सुधारित उपयोजन (अपडेटेड अॅप्लिकेशन) उपलब्ध करून देण्यात आले आहे.
ई-पीक पाहणी प्रकल्पाचे राज्य समन्वयक श्रीरंग तांबे म्हणाले, ‘‘ई-पीकपाहणीची सुविधा प्रत्येकाच्या भ्रमणध्वनीत उपलब्ध झाली आहे.
त्यामुळे तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही. ‘खरीप हंगाम २०२३’ करिता राज्यातील शेतकरी नवे अद्ययावत उपयोजन २.०.११ (ई-पीक पाहणी अपडेटेड व्हर्जन) वापरु शकतील. त्यासाठी आधी भ्रमणध्वनीमधील ‘गुगल प्लेस्टोअर’वर जाऊन नवे उपयोजन डाऊनलोड करून घ्यावे लागेल. नव्या उपयोजनमुळे ई-पीकपाहणीची नोंदणी जलद व सुलभ पद्धतीने होईल.
१ कोटी ८८ लाख शेतकऱ्यांकडे ॲप
महसूल विभागाने १५ ऑगस्ट २०२१ पासून राज्यभर ई-पीकपाहणीचा प्रकल्प सुरू केला. खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात या प्रकल्पाच्या आधारे लक्षावधी शेतकरी भ्रमणध्वनीच्या आधारे पीकपाहणी करीत आहेत. देशातील हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. आतापर्यंत राज्यातील १ कोटी ८८ लाख शेतकऱ्यांनी उपयोजन (ॲप) डाऊनलोड करीत नोंदणी केली आहे.
शासनाने ई-पीकपाहणीच्या नोंदणीचा पर्याय शेतकऱ्यांना दिला असला तरी दुर्गम भागात शेतकऱ्यांमध्ये भ्रमणध्वनी साक्षरता नाही. त्यामुळे ई-पीक पाहणी तेथे होत नाही. अशा शिल्लक राहिलेल्या भागात शेतकरी आपापल्या भागातील तलाठ्याकडे जाऊन सातबाऱ्यावर पीकपाहणी नोंदवून घेतात.
ई-पीकपाहणीची मुदत संपल्यानंतर पुन्हा तलाठ्यांनाही किमान ३० दिवसांपर्यंत नोंदणीची मुदत शासनाकडून दिली जाते. कोणताही शेतकरी पीकपाहणीपासून वंचित राहू नये, यासाठी काळजी घेतली जात असल्याचे महसूल विभागाचे म्हणणे आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.