Khadakwasla to Fursungi Tunnel : खडकवासला ते फुरसुंगी २८ किमी बोगद्याचा प्रस्ताव सादर
Pune Development News : पाण्याची गळती होऊ नये यासाठी शासनाकडून योग्य ती पावले उचलण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर खडकवासला धरण ते फुरसुंगीदरम्यान प्रस्तावित असलेल्या सुमारे २८ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचा अहवाल राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडून राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.
या प्रकल्पास लवकरच प्रशासकीय मान्यता मिळण्याची शक्यता आहे,अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.
जलसंपदा विभागाने या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्यासाठी निविदा काढून काम देण्यात आले होते. संबंधित कंपनीकडून याबाबतचा अहवाल तांत्रिक जलसंपदा विभागाकडून तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठविण्यात आला होता.
या समितीने मध्यंतरी त्या अहवालात काही त्रुटी काढल्या होत्या. त्या दुरुस्त करून दिल्यानंतर समितीने या प्रकल्पास सकारात्मकता दाखवत तो राज्य सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविला आहे.
प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर सुमारे २.८ टीएमसी म्हणजेच शहराला दोन महिने पुरेल एवढे पाणी वाचणार आहे. तसेच पाणीगळती कमी होऊन शेतीला पाणी मिळणार आहे.
मार्च ते मे या तीन महिन्यांत कडक उन्हाळा असतो. या तीन महिन्यांच्या कालवधीत कालवा आणि धरणातील पाण्याचे होणारे उन्हाळ्यातील बाष्पीभवन तसेच आवर्तन आणि गळतीमुळे जवळपास २.८ टीएमसी पाणी वाया जाते.
हे पाणी खडकवासला धरण ते फुरसुंगी दरम्यान बोगद्यातून नेल्यास त्यामध्ये बचत होऊ शकते. त्यामुळे पावसाळा लांबला तरी बचत झालेल्या या पाण्याच्या मदतीने जुलैअखेरपर्यंत पाणीटंचाईचा सामना करता येईल, असे या अहवालावरून समोर आले आहे. त्यादृष्टीने हा प्रकल्प शहरासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
नवे धरण बांधणे शक्य नाही
कृष्णा पाणी तंटा लवाद प्राधिकरणानुसार पुणे जिल्ह्यात नवे धरण बांधणे शक्य नाही. कारण आवश्यक असलेले पाणी यापूर्वीच अडवून त्यावर धरणे बांधण्यात आली आहेत. तसेच नवीन धरण बांधावयाचे झाल्यास नवीन जागेचा शोध घ्यावा लागेल.
यासह भूसंपादन आणि पुनर्वसन हे काम अवघड आहे. या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर बोगद्याद्वारे पाणी नेण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
..असा असणार बोगदा
जलसंपदा विभागाकडून ७.८० मीटर रुंद, ३.९० मीटर उंच या आकाराच्या बोगद्यातून खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान बोगद्यातून पाणी नेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
या बोगद्यामुळे कालव्याची क्षमता १५१० क्युसेक होणार असून, ते सर्व पाणी गुरुत्वाकर्षण शक्तीने फुरसुंगीपर्यंत नेण्यात येणार आहे.
त्यामुळे पाण्याचे प्रदूषण, गळती आणि बाष्पीभवन रोखण्यास मदत होऊन सुमारे अडीच टीएमसी पाणी वाचणार आहे.
हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य
धरणापासून सुमारे २५ किलोमीटर लांबीच्या बोगद्यातून पाणी नेण्याच्या कामासाठी सुमारे दीड हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.
साधारणतः एक टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्यासाठी भूसंपादन आणि प्रत्यक्ष धरण उभारणे यासाठी सुमारे एक हजार कोटी रुपयांचा खर्च येतो.
यानुसार अडीच टीएमसी क्षमतेचे धरण बांधण्यासाठी सुमारे तीन हजार कोटी रुपये लागू शकतात. मात्र, बोगद्यातून पाणी नेणे हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य असल्याचे जलसंपदा विभागाचे म्हणणे आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.