
सोलापूर ः महात्मा फुले कर्जमाफी योजनेतून (Mahatma Phule Loan Waiver Scheme) वगळलेल्या शेडनेटधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी पंढरपूर-मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांनी विधीमंडळ अधिवेशनात केली.
नागपूरच्या विधीमंडळ अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे आमदार आवताडे यांनी हा प्रश्न मांडला. पंढरपूर, मंगळवेढ्यासह जिल्ह्यातील काही तालुक्यांतील शेतकऱ्यांनी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून शेडनेट उभारले आहे. त्यासाठी बँकांकडून कर्जे घेतली आहेत. त्या कर्जासाठी जमिनी गहाणखत ठेवल्या आहेत.
परंतु अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने हे सर्व शेतकरी आर्थिकदृष्ट्या तोट्यात आले आहेत. परिणामी घेतलेले कर्ज हे शेतकरी भरू शकत नाहीत. आता वाढत्या कर्जाच्या बोजामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. बँका थेट शेतकऱ्यांकडील कर्ज वसुलीसाठी तगादा लावत आहेत. विशेष म्हणजे हे सर्व शेडनेटधारक शासनाच्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेतही बसत नाहीत, त्यांची नावे वगळण्यात आली आहेत.
पण या शेतकऱ्यांना आधार देण्याची गरज आहे. एकट्या मंगळवेढ्यातील ८० शेतकरी आहेत. तरी शासनाने या सर्व बाबींचा विचार करून या शेतकऱ्यांचा समावेश महात्मा फुले कर्जमाफी योजनेत करावा, अशी मागणी आमदार समाधान आवताडे यांनी अधिवेशनात केली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.