
Nagpur News : संत्रापट्ट्यात लिंबूवर्गीय फळ बागायतदार फळगळतीच्या समस्येने जेरीस आले आहेत. परिणामी यंदा उत्पादकता प्रभावित होण्याची भीती आहे. कृषी विद्यापीठाकडून याबाबत उपाययोजना राबविण्यासाठी जागृतीवर भर दिला जात आहे. मात्र अपेक्षित नियंत्रण अद्यापही साध्य झाले नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे.
राज्याच्या एकूण दीड लाख हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे एक लाख हेक्टर संत्रा, मोसंबीखालील क्षेत्र विदर्भात आहे. राज्याची एकूण उत्पादकता मृग आणि आंबिया बहार मिळून पाच लाख टन इतकी अत्यल्प आहे.
यामध्ये आंबिया बहार घेणारे ६० टक्के तर उर्वरित ४० टक्के मृग बहाराचे नियोजन करतात. आंबिया बहार घेणाऱ्यांची संख्या मोठी असतानाच सध्या लिंबाच्या आकाराची फळे असलेल्या बागेत फळमाशीमुळे गळ होत आहे.
काटोल येथील संत्रा उत्पादक मनोज जवंजाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या फळाची साल काहीशी टणक आहे. परिणामी फळमाशीची उत्पत्ती रोखण्यासाठी बागेत ट्रॅप (कामगंध सापळे) लावले पाहिजे. त्यांनी त्यांच्या बागेत अशाप्रकारच्या उपाययोजना केल्या आहेत. काही बागांमध्ये पावसाचे पाणी थांबले आहे.
निचऱ्याची सोय करावी. कोलेटोट्रिकम बुरशीचा प्रादुर्भाव अशा काळात होतो. त्याच्या नियंत्रणासाठी मित्रबुरशीची वाढ होण्यासाठीच्या आवश्यक उपाययोजना करणे प्रभावी ठरते. त्याकरिता झाडांना ड्रेचिंग करणे, गवत कापून ते कुजण्यासाठी सोडणे. सेंद्रिय किंवा रासायनिक बुरशीनाशक यापैकी जो योग्य असेल त्या पध्दतीचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा, असा सल्ला त्यांनी दिला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.