
ॲग्रोवन वृत्तसेवा
Ajit Pawar : कोल्हापूर : पंचगंगा प्रदूषणमुक्त झाली पाहिजे, यासाठी शासन ठोस उपक्रम हाती घेणार आहे. कोल्हापूर शहराची हद्दवाढ करण्यासाठी कठोर निर्णय घ्यावे लागतील. पुढील ५० वर्षांचा विचार करून हद्दवाढ झाली पाहिजे, तरच कोल्हापूरचा विकास झपाट्याने होईल, असे मत उपपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. त्या वेळी ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले, ‘पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपक्रम हाती घेतला जात आहे. तो लवकरच कार्यान्वित केला जाईल. ‘पंचगंगे’च्या पुराबद्दल अनेक जण अनेक मते मांडत आहेत. तज्ज्ञ आणि स्थानिकांची वेगवेगळी मते आहेत. पूरस्थिती रोखण्यासाठी महामार्गावर काही बदल किंवा उड्डाण पूल करावे लागतील का, या संदर्भात केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा केली जात आहे. स्थानिक खासदार, आमदार इतर लोकप्रतिनिधीही याचा वारंवार पाठपुरावा करत आहेत. त्यामुळे पुराचा प्रश्न निकालात निघू शकतो.’
दरम्यान, पंचगंगा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामध्ये अनेकांचे नुकसान होते. अशावेळेला प्रत्येक कुटुंबाला पाच हजार रुपये दिले जाते होते. या अनुदानात वाढ करून प्रतिकुटुंब दहा हजार रुपये देऊन शासनाने मदत केली आहे. अतिवृष्टी किंवा पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतीला भरपाई देण्यासाठी शासन पूरग्रस्तांमागे ठामपणे उभे असल्याचेही पवार यांनी सांगितले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.