
सिंधुदुर्गनगरी ः फळपीक विम्याबाबत (Crop Insurance) जनजागृतीकरिता जिल्ह्यात चित्ररथ दाखल झाला आहे. हा रथ जिल्ह्यातील विविध गावांतील शेतकऱ्यांमध्ये फळपिकांचे क्षेत्र संरक्षित करण्याविषयी जागृती करणार आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत विमा उतरविण्यासाठी मुदत आहे.
रब्बी हंगामात जिल्ह्यात प्रमुख आंबा, काजू पिकांसह केळीचा फळपीक विमा योजनेत समावेश आहे. जिल्ह्यात आंबा, काजू पिकांखाली असलेले क्षेत्र आणि प्रत्यक्षात विमा संरक्षित केले जाणारे क्षेत्र यामध्ये मोठी तफावत आहे. गेल्या काही वर्षांत फळपीक विमा योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा वाढला असला तरी अद्याप अपेक्षित शेतकरी विमा उतरवित नाहीत. मागील काही वर्षांपासून अवकाळी पाऊस, तापमान वाढ, ढगाळ वातावरण यामुळे सातत्याने पिकांचे नुकसान होते.
त्यामुळे अधिकाधिक बागायतदारांनी फळपीक योजनेचा लाभ घ्यावा या हेतुने विमा कंपनीने जागृती करण्यासाठी चित्ररथ तयार केला असून तो गावागावात जाऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणार आहे. या चित्ररथाला झेंडा दाखवून जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार श्रीधर पाटील यांनी जागृती मोहिमेचा प्रारंभ केला.
या वेळी जिल्हा कृषी कार्यालयाचे अरुण नातू, सिद्धेश येडवे, कृषी पर्यवेक्षक संभाजी घाडी, स्वामिनी परब, जीवन राणे आदी उपस्थित होते. आंबा, काजूसह केळी पीक क्षेत्र संरक्षित करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे, असे कृषी विभागामार्फत सांगण्यात आले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.