Agriculture Irrigation : बारामतीत शेतकऱ्यांचा जलसंपदा खात्याच्या कार्यालयासमोर ठिय्या

Agriculture News Baramati : शेती सिंचनासाठी उन्हाळी दोन आवर्तन दिली खरी, परंतु योग्यवेळी न दिल्याने सध्याला ऊस, भाजीपाला, चारा पिके पाण्याच्या टंचाईमुळे जळू लागली आहेत.
Farmer Protest
Farmer Protest Agrowon

Pune News : शेती सिंचनासाठी उन्हाळी दोन आवर्तन दिली खरी, परंतु योग्यवेळी न दिल्याने सध्याला ऊस, भाजीपाला, चारा पिके पाण्याच्या टंचाईमुळे जळू लागली आहेत. उभी पिके वाचविण्यासाठी नीरा डावा कालव्यांतर्गत १८ फट्याला पाणी सोडावे, अशी आग्रही मागणी सोमवारी (ता. १२) अनेक शेतकऱ्यांनी माळेगाव कॉलनी (ता. बारामती) येथील जलसंपदा खात्याकडे केली.

तसेच सांगवी, कांबळेश्वर, शिरष्णे, धुमाळवाडी, शिरवली, मानाजीनगर, पवईमाळच्या अनेक शेतकऱ्यांनी पाण्यासाठी थेट येथील जलसंपदा खात्याच्या कार्यालयासमोरच ठिय्या मांडला.

जलसंपदा खात्याच्या वतीने शाखा अभियंता प्रमोद दिवेकर हे आंदोलनकर्त्यांना सामोरे गेले. दुसरीकडे, १२ जूनअखेर वीर, भाटघर धरणात पाणीसाठा अत्यल्प राहिला आहे. पिण्याचे पाणी, पालखी सोहळा आणि इंदापूर तालुक्यातील उन्हाळी पहिले उर्वरित आवर्तन पूर्णत्वाला आण्यासाठीच उपलब्ध पाण्याचा वापर केला जात आहे.

Farmer Protest
Agriculture Irrigation : खडकवासला धरणातून शेतीसाठी १५ जूनपर्यंत आवर्तन

नीरा डावा कालवा सल्लागार समितीने ठरवून दिलेली दोन उन्हाळी आवर्तने बारामती तालुक्यात दिलेली आहेत. यापुढील काळात शेती सिंचनासाठी पाणी मिळू शकत नाही, अशी माहिती अधिकृतरीत्या कार्यकारी अभियंता राजेंद्र धोडपकर यांनी आंदोलनकर्त्यांना यावेळी मोबाईलद्वारे कळविली.

मात्र आंदोलनकत्यांसह विविध पाणी वापर संस्थांचे प्रशासन, शेतकरी सोमवारी पाण्याच्या मागणीवर ठाम होते. त्यामध्ये सांगवीचे विजय तावरे, कांबळेश्वरचे युवराज खलाटे, बाळासाहेब वाबळे, कुलभूषण कोकरे, लक्ष्मण तात्या जगताप, किरण तावरे, विरसिंग तावरे, उदयसिंह धुमाळ, पोपटराव जगताप, विजय घनवट, प्रकाश भगवान तावरे, अरविंद जगताप आदी शेतकऱ्यांनी निर्णायक भूमिका मांडली.

काळभैरवनाथ पाणी वापर संस्था धुमाळवाडी, जानुबाई पाणी वापर संस्था शिरवली, कृष्णा पाणी वापर संस्था सांगवी, ज्योर्तिलिंग पाणी वापर संस्था कांबळेश्वर आदी संस्थांच्या प्रशासनाने यावेळी सिंचनासाठी पाण्याची गरज असल्याचे लेखी म्हणणे जलसंपदा खात्याला कळविले.

Farmer Protest
Agriculture Irrigation : शाश्‍वत विकासामुळेच निढळला आर्थिक सुबत्ता : नाना पाटेकर

या बाबत शेतकरी विजय तावरे म्हणाले, ‘‘नीरा डावा कालव्याचे उन्हाळी आवर्तन देताना जलसंपदा खात्याने शेतकऱ्यांच्या गरजेनुसार पाण्याचे वाटप करणे आवश्यक होते. १५ मार्चला शेती सिंचनासाठी पाणी सोडणे गरजेचे होते, परंतु तेथे चूक करीत ते पाणी १ मार्चलाच सोडून दिले होत. तसेच त्यानंतर १५ मे ला सिंचनासाठी पाणी सोडणे गरजे असताना ते आवर्तन १३ एप्रिलला सोडून जलसंपदा खाते मोकळे झाले होते.

त्यामुळे दोन आवर्तनामधल्या कालावधीचे नियोजन व्यवस्थित न झाल्याने खरेतर सध्याला पाण्याची टंचाई भेडसावत आहे. पाऊस लांबल्याने ऊस, तसेच चारा पिके पाण्याअभावी जळू लागली आहेत. त्यासंबंधीची दखल घेऊन जलसंपदा खात्याने तातडीने १८ फाट्याला पाणी सोडावे.’’

नीरा नदीत पाणी आले कोठून...

शेती सिंचनासाठी धरणात पाणी नाही, असे सांगितले जाते तर मग नीरा नदीमध्ये नीरा डावा कालव्याचे पाणी कसे आले, असा सवाल शेतकरी किरण तावरे यांनी जलसंपदा खात्याला केला. सरकार भाजपचे, पालकमंत्री व जलसंपदा खात्याचे मंत्री भाजपचे असताना नीरा नदीमध्ये नीरा डावा कालव्याचे पाणी सोडण्यात आले.

ही प्राप्त स्थिती असताना विनाकारण विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे नाव या प्रक्रियेत घेतले जाते. हे बरोबर नाही. प्रदूषित झालेल्या नीरा नदीमध्ये पाणी का सोडले आणि कोणाच्या सांगण्यावरून सोडले याचा जाब जलसंपदा खात्याने दिला पाहिले, अशी मागणी तावरे यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com