
Solapur News : नीरा उजवा कालव्यावरील मैल ९३ ला सांगोला तालुक्यातील लाभ क्षेत्रातील गावांना नियमानुसार ‘टेल टू हेड’ पाणी दिलेले नाही. या विरोधात गुरुवारी (ता.३१) लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाटबंधारे पंढरपूर उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. नियमानुसार पाणी न मिळाल्यामुळे लाभक्षेत्रातील पाणी वापर संस्था अधिकाऱ्यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागतील, असे या वेळी शेतकऱ्यांनी सांगितले.
नीरा उजवा कालव्याचे पाणी नियमानुसार ‘टेल टू हेड’ देणे बंधनकारक आहे. मात्र त्यातही राजकारण सुरू झाल्यामुळे या कालव्यावरील मैल ९३ ला शेवटच्या गावांना पाणी देण्यात आले नाही. यामुळे या लाभक्षेत्रातील शेतकरी पाण्याच्या अन्यायाविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत.
‘आमच्या हक्काचे पाणी जातंय तरी कुठे, पाण्यासाठी आम्ही आंदोलने अजून किती वर्षे करावी लागणार, असे प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. हक्काच्या पाण्यासाठी प्रत्येक वेळी आम्हाला आंदोलनाची वेळ येते.
नियमानुसार आम्हाला पाणी का मिळत नाही, पाण्याचे नियोजन अधिकारी व कालवा सल्लागार समिती का करीत नाही, असे प्रश्न शेतकऱ्यांनी विचारले. शेतकऱ्यांनी पाटबंधारेच्या पंढरपूर उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन केले. आमदार शहाजी पाटील यांनी लाभ क्षेत्राला पाणी देण्यासंदर्भात या वेळी सूचना दिल्या.
‘आमच्या नुकसानीला जबाबदार कोण ?’
नीरा उजवा कालव्याचे पाणी नियमाप्रमाणे ‘टेल टू हेड’ देणे आवश्यक असताना शेवटच्या गावांनाच पाणी मिळाले नाही. पाण्याच्या आशेवर पेरणी केली. परंतु पाणी न मिळाल्याने पिके वाया जात आहेत. या नुकसानीला कोण जबाबदार आहे, असा प्रश्न शेतकरी बाळासाहेब भुसे यांनी केला.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.