
संदीप नवले, अॅग्रोवन वृत्तसेवा
Maharashtra Dam Water Storage Latest Update : पुणे : जूनमध्ये पावसाने दडी दिली. जुलैमध्ये कोकण, पूर्व विदर्भ, परभणी, नांदेड वगळता इतर भागांत पुरेसा पाऊस झाला नाही. त्यामुळे मराठवाड्यातील जायकवाडी, पश्चिम महाराष्ट्रातील उजनी आदी मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा स्थिती चिंताजनक आहे.
राज्यातील धरणांत सध्या केवळ ५६ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो जवळपास १४ टक्क्यांनी कमी आहे. त्यात यापुढे कमी पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यातील प्रमुख धरणे भरतील की नाही, या विषयी शंका आहे. त्यामुळे पुरेसा पाऊस न झाल्यास आगामी काळात पाणी संकट गंभीर होण्याची शक्यता आहे.
जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे राज्यातील काही धरणांत पाण्याची आवक झाली असली तरी ती समाधानकारक नाही. जलसंपदा विभागाकडील लहान, मध्यम व मोठे अशा एकूण दोन हजार ९९४ प्रकल्पांत १ हजार ४२२.१२ टीएमसीपैकी ८०३.४६ टीएमसी (२२ हजार ७५८.०८ दशलक्ष घनमीटर) म्हणजेच केवळ ५६ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास १४ टक्क्यांनी हा पाणीसाठा कमी आहे.
राज्यात मॉन्सून दाखल होऊन जवळपास दोन महिने उलटले आहेत. या काळात पश्चिम घाटमाथ्यावर व पूर्व विदर्भात पाऊस झाला. तेथील धरणांत पाण्याची चांगली आवक झाली. जुलै महिन्यात जवळपास १७ तारखेपर्यंत काहीशी उघडीप होती. त्यानंतर पावसाने विविध भागांत दमदार हजेरी लावली. त्यामुळे धरणांत जवळपास ७७० टीएमसीपर्यंत पाणीसाठा आला आहे. यामुळे धरणांतील पाणीसाठा वाढण्यास मदत झाली. त्यामुळे अनेक धरणांतील पाणीसाठा कसातरी ५० टक्क्यांवर पोहचला आहे. गेल्या वर्षी याच काळात ७०.३६ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.
मोठ्या प्रकल्पात ६१ टक्के पाणीसाठा :
कोयना, जायकवाडी, वारणा, उजनी, मुळा, पवना अशी जवळपास १३९ मोठी धरणे आहेत. या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात हलका ते मध्यम पाऊस झाल्याने पाण्याची काहीशी आवक झाली. दोन महिन्यांत मोठ्या धरणांतील पाणीसाठा ६२६.५४ टीएमसी म्हणजेच सरासरी ६१.०५ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी या प्रकल्पात ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा त्यात १५ टीएमसीने घट आहे.
मध्यम, लघू प्रकल्पांत कमी पाणीसाठा :
यंदा मध्यम व लघू प्रकल्पात पावसाचे प्रमाण कमी अधिक राहिले. त्यामुळे काही धरणांत अजूनही पाण्याची आवक सुरू झालेली नाही. सध्या मध्यम २६० प्रकल्पांत १०१.५७ टीएमसी म्हणजेच ५२.२६ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी या धरणांत ६६ टीएमसी पाणीसाठा होता. लघू २५९० प्रकल्पांमध्ये ७५.३२ टीएमसी म्हणजेच ३६ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी या धरणांत ५१ टक्के पाणीसाठा होता.
महत्त्वाच्या धरणांतील पाणीसाठा (टीएमसी) :
धरणे---एकूण क्षमता---आजचा साठा--- यंदाची टक्केवारी -- गेल्या वर्षीची टक्केवारी
माणिकडोह---१०.१७---४.८३--- ४७ --५७
घोड---५.४७---०.८८--- १८ -- ८०
उजनी---११७.२१ --- १.०५---१.९७ -- ८०
कण्हेर---९.५९---६.४४--- ६७ -- ७०
उरमोडी---९.६५---५.६०---५८ -- ७१
कोयना---१०५.२४--- ७०.७९---७० -- ६०
मुळा---२१.५०---१३.३८---६२ -- ७१
हतनूर---९.००---१.९९---२२ -- १९
करंजवण---५.३७---२.३९---४४ -- ८१
गिरणा---१८.५०---६.१०---३३ -- ९०
जायकवाडी---१०२.६७---२४.७६--३२ --९०
निम्न दुधना---८.५४---२.३६---२८-- ६८
मांजरा---६.२५---१.६८---२६--३९
माजलगाव---१०.९८---१.७९---१६-- ४६
पूर्णा येलदरी---२८.६०---१७.१०---५९ -- ६८
इसापूर---३४.०३---२१.२९---६२ -- ९२
बेंबळा---६.४९---२.१३--- ३२ -- ५६
सिरपूर---५.६५---३.६७ ---६५ -- ४३
विभागनिहाय धरणांतील पाणीसाठा (टीएमसी) :
विभाग ---संख्या --- पाणीसाठा --- टक्के
नागपूर --- ३८३ -- १०८.२१ --- ६६.५४
अमरावती -- २६१ --- ८४.०८ --- ६३.०९
छत्रपती संभाजीनगर -- ९२० --- ७७.८५ -- ३०.३७
नाशिक --- ५३५ -- १०३.०८ -- ४९.१९
पुणे --- ७२० -- ३२०.५२ -- ५९.७२
कोकण --- १७३ --- १०९.६९ --- ८३.८६
Remarks :
धरणांत ८०३ टीएमसी पाणीसाठा
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.