Kolhapur Rain Update : कोल्हापूर ः जिल्ह्यात पावसाचा जोर कमी-जास्त असला तरी धरणक्षेत्रात पाऊस सुरू असल्याने नद्यांचे पाणी वाढतच आहे. गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत पंचगंगा नदीच्या पाण्याचा वेग काहीसा मंदावला. मंगळवारी सकाळी नऊ वाजता पंचगंगा नदीची पातळी राजाराम बंधाऱ्याजवळ ४०.४ इंच होती. दुपारी तीन वाजता ती ४०.५ इंचांवर स्थिरावली. दोन दिवसांपूर्वी तासाला एक इंच वाढणारे पाणी मंगळवारी सहा तासांनी एक इंच वाढत होते.
संभाव्य पूरस्थितीमुळे नदीकाठच्या काही गावांतून नागरिकांनी स्थलांतर सुरू केले आहे. चिखली व आंबेवाडीसह कोल्हापूर शहरातील सुतारवाडा, शाहूपुरी कुंभार गल्ली, तावडे हॉटेल परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे.
पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. राधानगरी धरणातून कोणात्याही वेळी पाण्याचा विसर्ग सुरू होऊ शकतो. त्यामुळे २०१९ व २०२१ मध्ये ज्यांच्या घरात पुराचे पाणी आले होते त्या नागरिकांनी तातडीने शासकीय निवारागृहात किंवा आपल्या सोयीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले. जिल्हाधिकारी रेखावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयतील तळमजला तातडीने स्थलांतरित करण्याचे आदेश दिले. यानंतर संबंधित विभागांनी स्थलांतर प्रक्रिया सुरू केली. मंगळवारी (ता. २५) सकाळी आठपर्यंतच्या चोवीस तासांत चंदगडमध्ये सर्वाधिक ४२.९ मिमी पावसाची नोंद झाली. शिरोळ, भुदरगडमध्ये निरंक पाऊस झाला.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.