
पुणे ः वीजजोड देण्यास (Electricity Connection) हयगय व अर्ज दाबून ठेवणाऱ्या सुपे येथील कनिष्ठ अभियंत्यावर ‘महावितरण’ने (Mahavitaran) निलंबनाची कारवाई केली आहे. बारामती येथील कार्यकारी अभियंत्यांनी ही कारवाई केली आहे. ग्राहकसेवेप्रती कर्तव्यात कसूर करणाऱ्यांची गय करणार नसल्याचा संदेश ‘महावितरण’ने यातून दिला आहे.
अर्ज केला तरी वीजजोड मिळत नाही. भेटायला आले तर अभियंता गायब असतात. अशा अनेक तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून सुपे येथील वीज ग्राहकांकडून येत होत्या. त्याबाबत संबंधित अभियंता अभिषेक मडावी यांना वेळोवेळी कारणे दाखवा नोटीस व आरोप पत्र देऊन ५१ हजारांचा दंडसुद्धा ठोठावण्यात आला.
मात्र तरीही कामात कसलीही सुधारणा झाली नसल्याने बारामती विभागीय कार्यालयाने मडावी यांच्यावर बुधवारी (ता. १८) निलंबनाची कारवाई केली आहे.
निलंबन काळात मडावी यांना वालचंदनगर उपविभागीय कार्यालयात हजेरी लावावी लागेल. तसेच पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडून जाता येणार नाही.
सध्या महावितरण शेतकरी मेळावे घेऊन शेतीपंपांना वीजजोड देत आहे. मात्र मडावी यांनी जवळपास ६३ ग्राहकांचे अर्ज दाबून ठेवले. त्यांना जोड दिले नाहीत. त्यामुळे कंपनीचा सुमारे ५ लाख १३ हजारांचा महसूल बुडाला.
वरिष्ठांनी सुपे येथे ग्राहक मेळावा घेतला. त्या वेळी नेक ग्राहकांनी महावितरणकडे मडावी यांच्या कामाच्या तक्रारींचा पाढाच वाचला. गेल्या अनेक दिवसांपासून ते कोणत्याही रजेशिवाय गैरहजर आहेत. परिणामी वरिष्ठांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.