
Satara News : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम महिन्यावर येऊन ठेपला आहे. ऊसतोडणी कामगारांचे करार पूर्ण करण्याची कामे अंतिम टप्प्यात आहेत. उसाचे घटलेले क्षेत्र, पावसाअभावी उत्पादनात होणारी घट, कारखान्यांची वाढलेली संख्या व कमी काळात जास्त गाळपासाठी बहुतांश कारखान्यांनी वाढलेली गाळपक्षमता या सर्वांचा परिणाम आगामी गाळपावर दिसेल. ऊस कमी पडणार असल्याने उसाची पळवापळवी होणार आहे.
जिल्ह्यात महाबळेश्वर तालुका वगळता सर्व तालुक्यांत उसाचे उत्पादन घेतले जात आहे. सर्वच तालुक्यांत साखर कारखाने आहेत. या हंगामात तीन कारखान्यांची वाढ झाली आहे. या हंगामात १७ कारखाने ऊसगाळप करतील.
हंगामासाठी आवश्यक मजूर यंत्रणेचे करार केले जात आहेत. जिल्ह्याच्या सर्वच भागांत पावसाने पाठ फिरविल्याने उत्पादनात मोठी घट होणार आहे. उसाच्या क्षेत्रातही मोठी घट झाली आहे. त्याचबरोबर सर्व कारखान्यांची मिळून प्रतिदिन १२ ते १५ हजार मेट्रिक टन क्षमता वाढली आहे. त्यामुळे उसाची टंचाई भासणार आहे.
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील चार ते पाच कारखान्यांकडून जिल्ह्यातील ऊस नेला जातो. सांगली, कोल्हापूर बरोबरीने दर मिळत असल्याने त्या कारखान्यांना ऊस देण्यास शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. याचा परिणाम जिल्ह्यातील गाळपावर होईल. हंगाम सुरू होण्यापूर्वी दुसरा हप्ता द्यावा, अशी मागणी शेतकरी संघटना करत आहे.
दुसरा हप्ता किती, कधी देणार यावरही अनेक कारखान्यांचे भवितव्य ठरेल. जिल्ह्यात गत हंगामात १४ कारखान्यांनी गाळप केले. या हंगामात १७ कारखाने गाळप करण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार तोडणी यंत्रणांचे करार पार पडले आहेत. आता ऊस नेण्याची स्पर्धा लागणार आहे.
चांगला दर, तिकडे ऊस
कारखान्यांकडून ऊस जास्ती जास्त आपल्याकडे नेण्याची स्पर्धा लागणार आहे. यातून जास्तीच्या दराचेही आमिष दाखविले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना ऊस देण्यासाठी कारखान्यांचा पर्याय निर्माण होईल. याचा शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याने चांगला दर तिकडे ऊस असे सूत्र राहील.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.