अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे ः भारतीय कृषी क्षेत्रात भाजीपाला संशोधनाला दिशादायक वळण देणारे प्रख्यात कृषिशास्त्रज्ञ माजी कुलगुरू डॉ. कीर्ती सिंह (Dr. Kirti Singh) यांचे सोमवारी (ता. २३) उत्तर प्रदेशातील जौनपूर येथे निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते.
आचार्य नरेंद्र देव कृषी विद्यापीठाचे कुलगुरूपद भूषविणारे डॉ. सिंह पुढे भारतीय कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे अध्यक्ष झाले. त्यांना राज्यातील कृषी शास्त्रज्ञ तसेच आजी-माजी कुलगुरूंनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
माजी कुलगुरू डॉ. किसन लवांडे यांनी सांगितले, की १९८७ पासून डॉ. सिंग यांच्याशी माझा स्नेह होता. त्यांनीच भारतीय भाजीपाला संशोधनाचा पाया रचला आहे. ‘इंडियन सोसायटी ऑफ व्हेजिटेबल सायन्स’चे ते संस्थापक अध्यक्ष होते.
त्यांच्यासोबत भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या अनेक समित्यांमध्ये काम करण्याचा योग आला. कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाद्वारे त्यांनी शेकडो नव्या शास्त्रज्ञांना संधी दिली.
डॉ. सिंह हे महाराष्ट्रातील शेतीविषयी विशेषतः भाजीपाला पिकांमधील होणाऱ्या असंख्य प्रयोगांविषयी सतत माहिती घेत असते. शास्त्रज्ञ व शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणारा ज्येष्ठ शास्त्रज्ञ म्हणून त्यांचा देशभर लौकिक होता.
डॉ. लवांडे यांना कांदा व लसूण संचालनालयाचा संस्थापक संचालक म्हणून नियुक्त करण्यात त्यांचाच पुढाकार होता. कृषी क्षेत्रातील माणसं जोडणं आणि त्यांच्याशी संबंध टिकून ठेवण्याची त्यांची हातोटी देशातील कृषी विद्यापीठांमध्ये चर्चित होती.
नोनी या पिकाचा देशभर प्रसार करणारे डॉ. सिंह पुढे ‘वर्ल्ड नोनी रिसर्च फाउंडेशन’चे अध्यक्ष बनले होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.