
सोग्रस : चांदवड तालुक्यातील गावांमध्ये परतीच्या पावसाने खरीप पिकांचे (Kharif Crop) अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पंचनाम्यांच्या फेऱ्यात न अडकवता सरसकट हेक्टरी आर्थिक मदत देऊन पीकविमा (Crop Insurance) मंजूर करण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेच्या वतीने आमदार डॉ. राहुल आहेर, डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सोग्रस- शिरसाणे- भाटगाव या राष्ट्रीय महामार्ग क्र. ०७ च्या रस्ता उद्घाटनासाठी आमदार डॉ. आहेर, डॉ. कुंभार्डे आले असताना मनसे शेतकरी सेनेच्या शिष्टमंडळाने त्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, परतीच्या पावसाने संपूर्ण चांदवड तालुका अक्षरश: झोडपून काढला आहे. काढणीला आलेल्या सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, भाजीपाला, द्राक्ष, कांदा या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. रस्त्यांची देखील दुरावस्था झाली आहे. या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी सोयाबीन वाहून गेली. तर काही ठिकाणी सोयाबीनचे ढीग अजूनही पाण्यात आहेत. सोयाबीन व मका ही नगदी पिके मातीमोल झाली आहेत. २०२०, २०२१ व २०२२ ला सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले आहेत. परंतु, अद्याप कुठल्याही प्रकारची मदत मिळालेली नाही. त्यामुळे नुकसानीचे सरसकट पंचनामे करून पिकविम्याची रक्कम मंजूर करावी, ओला दुष्काळ जाहीर करावा, कोरडवाहू शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार, बागायतदार शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर एक लाख रुपये, तर फळबागायतदारांना प्रतिहेक्टर दीड लाख रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली आहे.
शेतकरी सेनेचे जिल्हा सरचिटणीस गोविंद गांगुर्डे, चांदवड तालुका संघटक दिगंबर गांगुर्डे, मनोज गांगुर्डे, सागर गांगुर्डे, नवनाथ गांगुर्डे, किशोर घोलप, बाळा शिंदे आदी या वेळी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.